महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २०१६ रोजी झालेल्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी लोकार्पणप्रसंगी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरक्षिततेच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांपासून सदरील पुलावरील पथदिवे बंद असून त्याकडे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लार्सन टुब्रो कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये नव्या गांधारी व सावित्री नदीवरील पुलावर पथदिवे आजपावेतो उभे करण्यात आलेले नाही. २ ऑगस्ट २०१६ रोजी सावित्री पूल दुर्घटनेनंतर केवळ १८० दिवसांमध्ये त्याच ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करून तो जनतेला लोकार्पण करताना रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा अपघात असल्याने यापासून बोध म्हणून नदीवरील पुलावर पथदिवे व कॅटआइज लावण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर संबंधित पुलांवर पहिल्या दोन वर्षांकरिता हे पथदिवे सुरू होते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून या पथदिव्यांची बिले वेळेवर भरली न गेल्याने दोन ते तीनवेळा महावितरण विभागाने येथील कनेक्शन तोडले होते. गेल्या पाच वर्षात पुलावरील पथदिव्यांच्या बाबतीत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आगामी गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भाविकांचा वाढता राबता पाहता सदरील पुलावर पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.