Thursday, April 24, 2025
Homeअध्यात्मशिंप्यास समंध बाधा

शिंप्यास समंध बाधा

विलास खानोलकर

एका शिंप्यास समंध बाधा होती, याची जाणीव त्याला नव्हती. पण श्री स्वामी त्याबद्दल कसे अनभिज्ञ राहणार? शिंप्याची समंध बाधा घालविण्यापूर्वी श्री स्वामींनी त्याच्याकडून अन्नदानाचे पुण्य करून घेतले. ५० लोकांच्या स्वयंपाकात ५०० माणसे जेवू शकली. त्याच्या या पुण्यशील कृतीमुळे काही प्रमाणात का होईना, समंधबाधित शिंप्याचे प्रारब्ध सौम्य झाले होते. समंधाला नेहमी गती (म्हणजे पुढील अवस्था) हवी असते. तशीच त्या शिंप्यामधील समंधालाही हवी असणारच. प्रसाद भोजनानंतर समंधबाधित शिंपी श्री स्वामींपुढे येऊन बसला. श्री स्वामी हे तर अशा समंधाचे कर्दनकाळ. समंधचा क्रोध श्री स्वामींना पाहताच उफाळून आला. ‘संन्याशास (श्री स्वामींस) असले खेळ कशाला पाहिजेत?’ म्हणून तो मोठमोठ्याने ओरडून नाचू लागला; परंतु श्री स्वामी समर्थांचे दर्शनच इतके प्रभावी होते की, त्यापुढे समंधाची मात्रा चालली नाही.

श्री स्वामी महाराज गरजले, ‘समंधाच्या मुसक्या बांधा’ श्री स्वामी मुखातील वाक्य म्हणजे महामंत्र, हे वाक्य ऐकताच त्या समंधाची स्थिती लुळी-पांगळी झाली. समंध पूर्णतः हतबल झाला. त्याला ती अवस्था सहन होईना. समंध श्री स्वामींची पार्थना करून सारखा पाया पडू लागला. श्री स्वामी तर कृपेचे सागर. त्यांनी समंधावर कृपा करून त्यास मुक्ती दिली. त्यासरशी सबंधबाधित शिंपी समंधातून मुक्त होऊन उठून बसला. समंधमुक्त शिंप्याने त्याचे उर्वरित आयुष्य श्री स्वामी उपासनेत घालविले.

या लीलेचा मथितार्थ इतकाच की, श्री स्वामी समर्थ सेवा कुणामध्येही अदृश्य स्वरूपात असलेली समंध बाधा अथवा पिशाच्चबाधेचे उच्चाटन करून त्या व्यक्तीस मुक्त आनंदी व सुखी करते. श्री स्वामी समर्थांच्या या सामर्थ्याबद्दल श्री गुरूलीलामृतात म्हटले आहे, ‘तंत्र-मंत्र-यंत्र-धूप-अंगारे दोरे। अन्न, वस्त्र फलादिक सर्व उतारे। न लगती पंचाक्षरी भूत काढणारे। द्रव्य देणारे फसवूनि ।।१३३।। अंगात आणणे बोलविणे।, हे काहीच न लगे करणे। केवळ दत्तात्रेय स्वामिदर्शने। पिशाच्यादि पावती सुगतीस ।।१३४।।‘ (श्री गुरूलीलामृत अ. ४८ श्लो. १३३,१३४)

ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकरांनी श्रीगुरू लीलामृतात केलेले वर्णन सद्यस्थितीतही लागू पडणारे आहे. ज्यांचे समंध, भूत, पिशाच्च, प्रारब्ध आदीबाबत घोर अज्ञान आहे. भोंदू, साधू, बुवा आदी अशा साध्या-भोळ्या, गरीब लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. मंत्र-तंत्र-यंत्र-धूप-अंगारे-धुपारे आदींचा वापर करून लुटतात. हे आपण ऐकतो, पाहतो, वाचतो पण बोध काय घेतो? श्री स्वामी समर्थंना अपेक्षित असलेली अंधश्रद्धा वाढू न देणे, हीसुद्धा श्री स्वामी समर्थ उपासनाच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -