डहाणू : कोरोना महामारी संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पावसाळ्याच्या दिवसात अन्य संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंखेत झपाटाने वाढ होताना दिसत आहे, यात ताप, सर्दी, खोकला, याचे सर्वाधिक रुग्ण निरनिराळ्या खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने, हवेतील दमटपणा कायम राहून, हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईनफ्लू, इत्यादी संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. तापाच्या आजाराने बंदरपट्टी भागातील वरोर, वाढवण, वासगाव, चिंचणी, धाकटीडहाणू, बाडापोखरण, परिसरात अनेक रुग्ण फणफणले आहेत. एका महिन्याभरापूर्वी चिंचणी येथे डेंग्यू चा रुग्ण आढळून आला होता, असे सांगण्यात आले.
सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा रुग्णांचा कल अधिक असल्याने रुग्णाच्या आजाराची नोंद मिळू शकत नाही. त्यातच सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. त्यातच भर म्हणजे काही गरीब लोक कुजलेले मासे सडका भाजीपाला आणि दूषित पाणी पिल्याने संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती आहे.