Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनोकरीच्या आमिषाचे राज्यभर जाळे

नोकरीच्या आमिषाचे राज्यभर जाळे

अॅड. रिया करंजकर

राजाराम म्हात्रे आणि शांताबाई म्हात्रे सकाळी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. दोघांचेही अंदाजे वय ६०-६५च्या घरात होतं. पोलीस स्टेशनला आल्यावर अक्षरश: ते रडायला लागले. पोलीस हवालदाराने त्यांना पाणी दिलं आणि शांत राहून झाला प्रकार सांगण्यास सांगितला. दोघांनी पाणी घेतलं आणि शांताबाईने पुढाकार घेऊन झालेला प्रकार पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यास सुरुवात केली. साहेब चार लाखांसाठी फसवणूक झाली हो आमची. जमापुंजी लुटली गेली हो, अशा प्रकारे तिने सुरुवात केली आणि झालेला प्रकार क्रमवार ती सांगायला लागली.

तीस वर्षांचा त्यांचा मुकेश नावाचा मुलगा आहे. त्याला कुठेही नोकरी-धंदा नाही. शिकलेला असूनही कुठेही त्याला नोकरी मिळत नाही, त्यामुळे ओळखीच्याच (म्हणजेच ते सध्या राहत असलेला पत्ता तात्पुरता असून त्यांची घर डेव्हलपमेंटसाठी गेलेली आहेत.) ते राहत असलेल्या पत्त्यावर नवीन कोणी नळजोडणी केली, तर ती तोडण्यासाठी बीएमसीचे काही कर्मचारी येत होते. अशीच एका कर्मचाऱ्याशी त्यांची ओळख झाली ते तिथे आले की, त्यांच्याशी त्यांचं बोलणं होत होतं म्हणून त्यांनी आपल्या मुलाला कुठे कामधंदा मिळेल का?, असं त्यांना विचारलं.

एक दिवस त्याने महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये शांताबाई व तिचा मुलगा मुकेश आणि त्यांची मुलगी रेश्मा यांना घेऊन आले व एस. के. पाटील यांच्याशी ओळख करून दिली. हे महानगरपालिकेमध्ये पाणी खात्यामध्ये लोकांना नोकऱ्या लावतात, असं सांगितलं. या लोकांची एस. के. पाटीलबरोबर बोलणी झाली व त्यांनी नोकरीला लावतो, असं सांगून चार लाख रुपये लागतील, असं त्यांना सांगितलं. टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील, असं दोन्ही पार्ट्यांमध्ये ठरलं. दीड लाख रुपये शांताबाईने एस. के. पाटील यांना अगोदर दिले. त्याच्यानंतर काही दिवसांनी मुलाचं मेडिकल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलवले असता तिथे अगोदरच काही उमेदवार उभे होते. हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांना उभं केलेलं होतं. आतमध्ये घेतलेलं नव्हतं. तिथे एस. के. पाटील यांनी धोत्रे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली आणि ते तुमचे मेडिकलचे चेकअप करतील, असं सांगितलं. एक महिला तिथे आली व त्यांनी येऊन छोटीशी बॉटल त्यांना दिली आणि तुम्ही व्यसन करता का, वगैरे असे तात्पुरते प्रश्न तिथल्या तिथे उभे राहून विचारले. एक फॉर्म दिला तो फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतला आणि तुमचं मेडिकल झालं, असं सांगून त्या बाकीच्या उमेदवारांना आणि मुकेशलाही घरी पाठवलं.

काही दिवस गेल्यानंतर एस. के. पाटील यांनी तुमच्या मुलाचं अपॉइंटमेंट लेटर तयार झालेले आहे. त्यामुळे भेटायला या, असं सांगितलं की, लोकं ठरलेल्या ठिकाणी भेटायला गेली असता त्यांनी अपॉइंटमेंट लेटरचा पेपर दाखवला व पुढील पैशाची मागणी त्यांनी केली. या लोकांनी मुदत मागितली आणि काही दिवसांनी तेही पैसे त्यांना दिले. हे सर्व पैसे शांताबाई आणि राजाराम हे चेकद्वारे एस. के. पाटील यांना देत होते आणि याच दरम्याने एस. के. पाटील हे महानगरपालिकेमधून निवृत्त झाले. ही गोष्ट शांताबाईंना कळली असता, ती त्यांना भेटायला गेली. तेव्हा एस. के. पाटील यांनी मला सेवानिवृत्त झालो तरी मी तुमच्या मुलाचं नक्की काम करणार आहे सांगून थोड्या दिवसांत त्याचा आयडी तयार होईल आणि एक फॉर्म दिला. हा फॉर्म तुम्ही बँकेत नेऊन भरा. त्याचा महानगरपालिकेचा पगार हा या बँकेत येईल, असं त्यांनी सांगितलं व आयडी कार्ड तयार होण्याच्या अगोदर उरलेली बाकीची रक्कम त्याने घेतली. मुलाचं भवितव्य होत आहे म्हणून शांताबाईने एकूण चार लाख रुपये त्यांना दिले.

शेवटची रक्कम घेतल्यानंतर भरपूर दिवस झाले, तरी अजून महानगरपालिकेकडून बोलणं कसं होत नाही म्हणून एस. के. पाटील यांना फोन केला असता, त्यांचा फोन स्वीच ऑफ यायला लागला म्हणून ज्यांनी ओळख करून दिली, त्यांना फोन केला असता त्यांचाही फोन स्वीच ऑफ येऊ लागला. त्याच्यानंतर ज्यांनी ओळख करून दिली, त्याला घेऊन शांताबाई राजाराम एस. के. पाटील यांच्या घरी गेले असता, तिथे त्यांना समजले की, त्यांनी अनेकजणांना महानगरपालिकेमध्ये कामाला लावतो, असे सांगून पैसे लोकांकडून उकळलेले आहेत आणि घरच्या लोकांना ते कुठे आहेत, त्यांचा काही स्थान पत्ता नाही, असे समजले. हे ऐकून दोघांनाही धक्का बसला आणि अधिक चौकशी केली असता, एस. के. पाटील यांनी महानगरपालिकेमध्ये लोकांना कामाला सांगतो, असं सांगून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून लोकांकडून पैसे उकळलेले होते आणि यामध्ये तो एकटाच नाही, तर पूर्ण त्यांची टीम काम करत होती.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेतल्यानंतर एस. के. पाटील याचा शोध घेण्यात आला व त्याच्याकडून हळूहळू एकेकाची नावं बाहेर येऊ लागली. या सर्व गोष्टीची मास्टरमाइंड एक स्त्री होती आणि ती पोलीस खात्यातून रिटायर झालेली महिला होती. मेडिकल चेकअप करणारे, अपॉइंटमेंट लेटर बनवणारे, आयडी बनवणारे असे कितीतरीजण एकत्र येऊन लोकांची महानगरपालिकेमध्ये नोकरी लावतो, असं
सांगून डुप्लिकेट पेपर बनवून लोकांची फसवणूक करत होते आणि कितीतरी वर्षे ही लोक फसवणुकीची कामे करत होते आणि ही तक्रार नोंदवली गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून लोक पुढे येऊ लागले आणि फसवणूक केलेल्या लोकांची संख्या १००च्या घरात गेली आणि अनेक ठिकाणाहून लोकांना समजलं की, आपली फसवणूक केली गेली आहे, तेव्हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंदवल्या गेल्या.

राजाराम व शांताबाई यांनी मुलाच्या काळजीपोटी व मुलाच्या भविष्यासाठी चौकशी न करता समोरच्या माणसावर विश्वास ठेवून नोकरीसाठी पैसे दिले. ते पण ओळखीच्या माणसाद्वारे आणि त्यांची मोठी फसवणूक झाली. समोरच्या माणसाने ओळखलं की, यांच्या मुलाला नोकरीची गरज आहे आणि त्याचाच फायदा एस. के. पाटीलसारख्या लोकांनी उचलला.

सामान्य माणूस कष्टातून एक एक पुंजी जमा करतो व असं कोणीतरी भेटलं की, ती कष्टाची पुंजी नको त्या ठिकाणी वाया जाते आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ मात्र येते.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -