सफाळे (वार्ताहर) : पश्चिम रेल्वेचे डीआरएम जी. सत्यप्रकाश हे एका कार्यक्रमानिमित्त डाहाणू येथे आले असता, रेल्वे प्रवाशांच्यावतीने डहाणूसाठी नवीन लोकल फेरी सुरु करावी, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. ते खासदार राजेंद्र गावित यांच्या बरोबर शनिवारी केळवे येथे दौऱ्यावर आले होते.
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावरून संध्याकाळी ६ ते ७:१० या १ तासापेक्षा अधिकच्या वेळेत डहाणू करीता लोकल उपलब्ध नसल्याने दोन्ही लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. डहाणू विरार लोकल सेवा सुरू होऊन ९ वर्षाचा काळ उलटला तरी डहाणू विरार लोकल फेऱ्या मध्ये वाढ मात्र झाली नाही. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईकडून डहाणूकडे येणाऱ्या लोकल मध्ये १ तासापेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी विरार डहाणू लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या मध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.
त्याअनुषंगाने गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई कडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबई कडून येणाऱ्या लोकल फे-यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांच्या वतीने डीआरएम यांच्याकडे करण्यात आली. तसेच पालघर भागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून या भागातील रेल्वे समस्या सोडवण्याची मागणी डीआरयुसीसी सदस्य केदार काळे यांनी डीआरएम आणि खासदार यांच्याकडे केली.
तसेच डहाणू ते वैतरणा रेल्वे स्थानकात असलेल्या विविध समस्या लवकरात लवकर सोडवून प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची मागणी खासदार गावित यांनी डीआरएम यांच्याकडे यावेळी केली. करोना काळात बंद करण्यात आलेली सकाळची डहाणू – विरार लोकल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डीआरएम यांनी सांगितले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजा ठाकूर, यतीन सावे आणि प्रवासी उपस्थित होते.