माधवी घारपुरे
आमची ऑस्ट्रेलिया ट्रीप छानच झाली. नुसत्याच भौगोलिक विविध स्थळांव्यतिरिक्त माणसांचे विविध स्वभावही वाचता आले. ‘केल्याने देशाटन…’ हे चूक नाही. ट्रीपमध्ये सर्व सधन आणि उच्चशिक्षित होते. चारच लोक पुण्याचे भाजीविक्रेते आणि रुखवताचं सामान विकणारे होते. शिक्षणही बेताचेच असले तरी स्वभावाने चांगले वाटले. ते चौघे अलग नाहीत हे कळूनही ते अलग पडले होते. विमानात त्यांच्या सीट्स नेमक्या आमच्या मागेच होत्या. काही फॉर्म भरणे, एअर होस्टेस काही म्हणाली, त्यांना कळत नव्हते. साहजिकच त्यांनी माझी मदत घेतली. मला क्षणभर हसू आलं आणि आपण कुणी मोठं असल्याचा भास झाला जो क्षण अत्यंत क्षुद्र होता. मन म्हणालं, तूच त्यांना नीट गोष्टी समजावून सांगितल्या तशी त्यांची भीड चेपली गेली.
सीडनीला पोहोचलो ते थेट हार्बर ब्रीज, मरियम चेअर वगैरे पाहून ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. रूम्स देताना त्या चौघी. दोन रूम आमच्याच उजव्या-डाव्या बाजूला आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही आणि इतरांच्या सुद्धा! कार्ड स्वाइप करून दार उघडण्यापासून माहिती करून घ्यावी लागली. मलाही त्यात आनंद मिळत होता. एक दोनदा त्यांनी ब्रेकफास्ट, लंचला इतरांबरोबर बसण्याचा प्रयत्न केला. पण दुर्लक्षितच झाले. माणसाचा खेडवळपणा माणसाला इतका अडगळीत टाकतो का? हा प्रश्न मला सतावत नव्हता, तर व्यवहारातल्या सत्याची जाणीव करून देत होता. हळूहळू ट्रीप संपत आली. उद्याला मुंबईला रवाना व्हायचं. सकाळचा आजचा वेळ पूर्णपणे ऑपेरा हाऊस बघण्यात गेला. संध्याकाळी एका देखण्या हॉलमध्ये सगळी जमा झाली. खरं तर लोकांनी आपापल्या ओळखी करून घेतल्या होत्या. पण वेळ होता म्हणून टूर मॅनेजरने परत ओळखी, आपापली स्पेशालिटी, छंद, बैठे खेळ असा प्रोग्रॅम आखला होता.
कुणी गाणी, कुणी बॅडमिंटन, कुणी ब्रिलियर्डस, कुणी डान्स आपापल्या हॉबीज सांगितल्या. समाजकार्य हे तर प्रत्येकच करतो, असे सांगत होता. एकाने तर सांगितलं,
“We can not live without society. The person who lives without society he may be the god or the beast. So we must help others. etc….”
आता माझा नंबर आला. मी उठले तोवर ठाण्यावरून मुलाचा फोन आला. हे म्हणाले, “मी सांगतो, तोवर तू बोलून घे.” मी फोन घेतला. मुलगा सांगत होता, “आई तू गेलीस आणि तिसऱ्याच दिवशी आपली कामवाली नीलाबाईच्या मुलाला ट्रेनमधून पडून अपघात झाला. तुला कळवले नाही. आज मात्र त्याचा पाय गुडघ्यापासून काढायचे निश्चित झाले. नंतर आर्टिफिशियल बसवणार आहेत. ६०-७० हजाराला प्रकरण जाईल.” नीलाबाईला आता १५०० चा चेक दिलाय जो तू गरजेसाठी सही करून दिला होतास. बाकी संस्थांकडून बघू असे तिला सांगितले. तू रागावणार नाहीस याची खात्री होती.
मी सांगितले, “Dont Worry. You have done a good job.” मला वाटलं, अगदी योग्य वेळेला लेकाचा फोन आलाय. इथे प्रत्येकाला समाजकार्य करायचं आहे. आपण फक्त १/१ हजाराचं आवाहन करू. २५/३० हजार आरामात जमतील. आताच फोन आलाय. खोटं काहीच नाही.
माझं फोनवर बोलणं होईपर्यंत त्यांच्यानंतर त्या चौघांतील एक पुरुष उभा राहिला. म्हणाला, “आमचा धंदाच असा आहे की, पहाटे चार, साडेचारला भाज्या आणायला मार्केटला जावं लागतं. खूप छंद जोपासावे वाटतात, पण वेळ नाही. पोरांना मात्र चांगलं शिकवतो, पैसा चांगला कमावतो. येळ मिळाला की, पुस्तकं वाचतो. इतकंच शिकलो की, देवाने इतकं दिलंय. मुलं पण शिकताहेत तर मिळकतीतले १०० रु. भाग १० रु. देवाला द्यायचे.” नमस्कार करून तो खाली बसला.
सर्वात शेवटी मी होते. योग्य ती माहिती देऊन सर्वांना एक एक हजार मदत करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने “वा छानच संधी! २-२ हजारही देऊ”, असे सांगितले. माझ्या मनाची झाडं खरं पारिजातकासारखी बहरतात. नंतर मात्र एकेकजण हळूहळू काढता पाय घेऊ लागला. कुणाकडे इंडियन करन्सी नव्हती. कुणाकडे खरेदीनंतर पैसेच शिल्लक राहिले नव्हते. कुणी आधीच उसने घेतले होते. कुणी सांगितले की, इंडियात गेल्यावर तुमच्या खात्यावर ट्रान्स्फर करू. एकूण नन्नाचा पाढा. एक दोघांनी फुलाची पाकळी नाही. पण परागकण तरी म्हणून ५००/५०० रुपये दिले.
बहरलेल्या प्राजक्ताची फुलं लवकरच कोमेजली. दुसरे दिवशी एअर पोर्टवर निघण्यासाठी जमलो, असं लक्षात आलं की, माझी नजर लोकं चुकवताहेत. मुंबई एअर पोर्टवर तर मला लांबूनच टाटा-बाय बाय केला गेला. आम्ही पण ट्रॉलीवर सामान टाकून निघालो तर मागून ताई-ताई आवाज आला. बघते तर भाजीवाले होते. म्हणाले, “ताई, खरेदी करून इतकेच ३५०० शिल्लक राहिले बघा. पुण्याच्या टॅक्सीचे पैसे ठेवून घेतलेत. तो पोरगा त्याच्या त्याच्या पायावर उभा राहिला की, हे पैसे सार्थकी लागतील. बराय! पुण्याला आला की, लेकीच्या लग्नाचं रुखवत आमच्याकडूनच घ्या बरं!” इतकंच बोलून गेले. माझं कोमेजलेलं झाड परत टवटवीत झालं. मन म्हणालं, “सोन्याचे मुलामे जरी समाजात असले ना, तरी निखळ सोनंही असतं बरं. फक्त ते ओळखता आलं पाहिजे.”
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…