अर्चना सोंडे
घर पाहावे बांधून अशी सामान्य जनांत एक म्हण आहे. घर बांधणे किती अवघड असते हे बांधणाऱ्यालाच ठाऊक. काहीजण आपल्या आयुष्याची कमाई ही या घर उभारणीत खर्ची घालतात. या घर बहाद्दरांना काही वेळेस कळत नाही, की नेमकी समस्या काय आहे. अशा वेळी ती माऊली येते, शास्त्रोक्त पद्धतीने घराचे निरीक्षण करते, काही चाचण्या करते, आणि वास्तूमध्ये समस्या असेल, तर त्या दूर करण्याच्या उपाययोजना देखील करते. अनेकांच्या वास्तूला तथास्तू करणारी ही लेडी बॉस म्हणजे वास्तू संजीवनीच्या संचालक गायत्री पाटोळे.
गायत्रीचा जन्म लालबागचा. पण बालपण आणि शालेय जीवन रत्नागिरी येथे गेले. शालेय शिक्षण आर. बी. शिर्के प्रशाला येथे पूर्ण करून रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजमधून एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गायत्रीच्या आई शैलजा बळीराम गुजर आणि बाबा बळीराम रावसाहेब गुजर दोघेही पेशाने शिक्षक होते. त्यामुळे मुलांना देखील शिक्षणाचे महत्त्व पटले होते. शिक्षण पूर्ण होताच गायत्रीचे लग्न झाले. गायत्री गुजर आता गायत्री संजय पाटोळे झाली. लग्नानंतर काही काळासाठी शिक्षणाचा विसर पडला. मूल मोठे होत होते. त्यावेळी गायत्रीच्या वाचनात वास्तुशास्त्र, ज्योतिषशात्र, अध्यात्म यांसारखे विषय आले. या वाचनातून कुतूहल वाढत होते. त्याचा अभ्यास हळूहळू सुरू केला. वास्तुशास्त्र हा अतिशय जटिल आणि सखोल विषय आहे. पण आपल्याला आवडत आहे त्यामुळे याच क्षेत्रात आपण काही तरी केले पाहिजे हे मत ठाम झाले आणि यानंतर गायत्रीच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात झाली.
वास्तुशास्त्र या विषयाचे ज्ञान संपादन करीत असताना त्यांना अनेक मान्यवर, अभ्यासक, तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी यावेळी बऱ्याच केसेस हाताळल्या. त्यातून विलक्षण असे काही अनुभव अगदी मनात घर करून राहिले आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही उक्ती अगदी तंतोतंत पटली. हे शास्त्र शिकत असताना प्रथम तळ्यात, मग नदीत, त्यानंतर समुद्रात असा शिक्षणाचा प्रवास घडत गेला, असे गायत्री पाटोळ अनुभव कथन करताना सांगतात. गायत्री या शास्त्राच्या लेक्चरर म्हणून देखील आता काम करू लागल्या आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत असंख्य राजयोग लिहिले गेले आहेत; परंतु व्यक्ती मात्र अन्नाला महाग झालेली आहे, असे चित्र काही वेळा समाजात दिसून येते. व्यक्तीचे वास्तव्य जर दूषित वास्तूमध्ये असेल, तर त्याच्या हातून काही कर्मच घडणार नाही; परंतु ज्यावेळी व्यक्ती दूषित वास्तू सोडून अन्य ठिकाणी वास्तव्यास जाईल. त्यावेळी व्यक्तीच्या हातून काही कर्म घडेल व त्याच्या कुंडलीत दर्शविलेले सर्व राजयोग त्यावेळी फलित होईल. म्हणजेच ‘घराची जर दिशा बदलली तर दशाच अनुभवास येईल’ हे एकमेव सत्य आहे आणि हे सत्य आपण कोणीही नाकारू शकत नाही, असे पाटोळे म्हणतात.
गायत्री यांनी केलेल्या वास्तुशास्त्राच्या उत्तम अध्ययन, अवलोकन व मार्गदर्शनाबद्दल त्यांना वेळोवेळी असंख्य ठिकाणी व्यासपीठावर सन्मानित केले गेले आहे. त्यांची या शास्त्रावर विलक्षण पकड आहे. कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर तेथील स्पंदने त्यांना लगेच जाणवतात. वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या यजमानाने त्या वास्तूमध्ये व्यतित केलेली अनेक वर्षे कशी सरली असतील? हे वास्तू पाहिल्यावर त्यांच्या चटकन लक्षात येते आणि यजमानाला त्याविषयी विचारणा केली असता, अगदी बरोबर ओळखलंत! असे उद्गार त्यांच्या मुखातून क्षणात बाहेर पडतात.
आजच्या युगात माणसाला भेडसावणारे अनेक प्रश्न, समस्या असतात. त्यातील ६०-७० टक्के समस्या या दूषित वास्तूमधील वास्तव्यातूनच निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे वास्तू, ही पंचमहाभुतांना व अष्टीदिशांना अनुसरूनच असावी. त्यातून माणसाच्या आयुष्याला गती मिळते व ही गती म्हणजेच माणसाने साधलेली प्रगती म्हणायला हरकत नाही. गायत्री यांनी वास्तूचे परीक्षण करून अनेकांचे सुखाचे चार दिवस वाढवून, त्यामागून येणाऱ्या दु:खाची तीव्रता कमी करण्यात अनेकांची मदत केली आहे. कारण दोषी वास्तूमधील वास्तव्य म्हणजे माणसाला भोगाव्या लागणाऱ्या मरण यातनाच. आज अनेक कुटुंबे गायत्रीचा सल्ला घेऊन आनंदी जीवन जगत आहेत.
वास्तुशास्त्राविषयी अपुऱ्या ज्ञानामुळे लोकं अफवा पसरवतात. काही लोकांना वास्तुशात्र मान्यदेखील नसते. पण गायत्री अभ्यासपूर्वकच आपले मत व्यक्त करते. झोपी गेलेल्याला जागे करणे फार सोपे आहे. पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करणे फार कठीण. या शास्त्राचा अभ्यास करताना प्रथम पंचमहाभुतांविषयी आपल्याला जाणून घ्यायला किमान दोन-तीन जन्म घ्यावे लागतील, असे गायत्री म्हणते. या शास्त्राविषयी अफवा पसरतात त्या दोन कारणांमुळे एक म्हणजे अपुऱ्या ज्ञानामुळे व दुसरे म्हणजे अपुऱ्या ज्ञानातून निर्माण केलेल्या अर्धवट नियमामुळे. वास्तू ही आपल्याला सुख-समृद्धी, आरोग्य प्रदान करत असते. त्यामुळे सर्वाचा थोड्या फार प्रमाणात तरी वास्तू अभ्यास असावा.
सर्वसामान्यांना वास्तुदोषाचे अवगुण कळावेत आणि त्यातून लाभ व्हावा हीच इछा. गायत्री स्वतः नवीन वास्तूची निवड कशी करावी? राहत्या वास्तूचे वास्तूदोष निवारण कसे करावे? आध्यात्मिक उपाय कसे करावे? यावर मार्गदर्शन करतात. आजपर्यंत अनेक वर्तमानपत्रांतून वास्तुशास्त्राविषयी त्यांनी लिखाण केले आहे. नॅशनल युनिटी अॅवॉर्ड २०१३, भास्कर भूषण पुरस्कार, यशाची गुढी पुरस्कार, आदी पुस्कारांनी गायत्री यांना त्यांच्या व्यावसायिक योगदानानिमित्त गौरवण्यात आले आहे.
आपल्या घराचा समतोल साधण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी घराचे वास्तू परीक्षण करणे गरजेचे आहे. वास्तू तथास्तू असे म्हटले जाते. वास्तूला मार्गदर्शन करून यजमानांच्या घरी संजीवनी फुकणाऱ्या गायत्री पाटोळे या ग्रेट लेडी बॉस आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…