Monday, February 17, 2025
Homeमहत्वाची बातमी‘तिकीट काढले म्हणजे रेल्वेची मालकी आपली नव्हे’; राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत वाढ

‘तिकीट काढले म्हणजे रेल्वेची मालकी आपली नव्हे’; राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत वाढ

सोनिका पाटील

मुंबई : मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये दिवसागणिक प्रवासी संख्या वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्या प्रवासी संख्येच्या दुप्पट बेशिस्तीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रेल्वे स्थानके, रेल्वेमध्ये स्वच्छता पाळा, थुंकू नका, सीटवर पाय ठेवून बसू नका अशा सूचना, पोस्टर, डब्यांमध्ये लिहिण्यात आले असले तरी बेशिस्त प्रवाशांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

अलीकडेच रेल्वे डब्यांत सीटवर पाय ठेवत राजेशाहीमध्ये बसण्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. आजूबाजूला कोणी बघत नसल्याने यातील काही महाशय चक्क आपले हातपाय पसरत सीटवर अंगच टाकून देताना पाहायला मिळतात. काही वेळा रात्रीच्या वेळी महिला डब्यांमध्ये झोपून जागा व्यापतात. दरम्यान, काही सुजाण प्रवाशांकडून या अशा बेशिस्त प्रवाशांना हटकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ‘रेल्वे तिकीट काढली आहे, बसेल नाही तर झोपेल’ अशी उर्मटपणे उत्तरे देण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

रेल्वे प्रवासात खाल्लेल्या वस्तूंचा कचरा सीटखाली टाकणे, तंबाखू-गुटखा-माव्याचा बकाणा रेल्वेच्या दरवाजातून अथवा खिडकीतून थुंकणे, आपल्या चप्पल-बुटांसह सीटवर पाय ठेवून बसणे-झोपणे आणि मालवाहू नेण्यासाठी लगेज डब्बा असताना देखील सामान्य डब्यात प्रवासासाठी येतात, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. दरम्यान, या बेशिस्तीचा त्रास इतर प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे. आपले इच्छित स्थळ येईपर्यंत उर्वरित प्रवाशांना या दांडगाईबाबत ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. कारण हे बेशिस्त प्रवासी ज्या सीटवर चप्पल-बुटांसह पाय ठेवून बसत असतात, त्या जागेवर दुसरा कुणीतरी प्रवासी येऊन बसत असतो. तेव्हा त्याचे कपडे खराब होतात तर बऱ्याच वेळेला त्यांच्या आडमुठेपणामुळे इतर प्रवाशांना त्याजागी बसता येत नाही.

रेल्वेने प्रवास करताना आपली काही जबाबदारी आहे, ती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. सीटवर पाय ठेवू नये हे सांगण्याची गरज का पडावी? प्रशासनांकडून वारंवार सूचना देऊन तसेच दंडात्मक कारवाई करूनही काही दांडगट प्रवासी अरेरावीच्या बळावर बेशिस्तीचे वारंवार दर्शन घडत आहे, ही गंभीर बाब आहे. आमची अशा बेशिस्त प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम सुरू असून पुन्हा आम्ही आवाहन करतो की, रेल्वे प्रवासात, स्थानकावर थुंकू नका, सीटवर पाय ठेवून बसू नका, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -