Monday, January 19, 2026

महाराष्ट्रासह १३ राज्यांवर वीज संकटाची शक्यता

महाराष्ट्रासह १३ राज्यांवर वीज संकटाची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र, तामिळनाडूसह १३ राज्यांना आता वीज खरेदी करता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी असलेल्या पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने वीज पुरवठा करणाऱ्या इंडिया एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या कंपन्यांना ५००० कोटींहून अधिक वीज बिल थकित असलेल्या १३ राज्यांना वीज पुरवठा करु नका असा आदेश दिला आहे. या १३ राज्यांना आताही वीज तुटवड्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ‘पोसोको’च्या या नव्या आदेशामुळे मात्र या राज्यांमधील वीज संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

वीज बिल थकित असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘पोसोको’ या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीच्या आदेशामुळे आता या राज्यांना वीज खरेदी करता येणार नाही.

‘पोसोको’ने या तीन वीज कंपन्यांना एक पत्र लिहिले आहे. या १३ राज्यांतील २७ वितरण कंपन्यांची विक्री ही १९ ऑगस्ट २०२२ पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करावी असा आदेश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या राज्यांकडे ५००० कोटी रुपयांहून अधिकची रक्कम थकित असल्याने कंपन्यांनी त्यांना करण्यात येणारा वीज पुरवठा बंद करावा म्हटले आहे. या राज्यांकडून जोपर्यंत थकित वीज भरलं जात नाही तोपर्यंत त्यांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करु नये असेही या पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment