मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग तयार करण्याचे काम सरकार करतच आहे. पण, याकरिता लागणाऱ्या जमीन संपादनाच्या कामात स्थानिक आमदारांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत सांगितले. दरम्यान, हा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल तसेच गौरी – गणपतीसाठी येत्या २५ ऑगस्टपर्यंत त्यावरील खड्डे भरले जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सुनील प्रभू यांनी या विषयावरील लक्षवेधी सूचना मांडली होती. कोकणात घरातली एक व्यक्ती गावी असते, तर चार मुंबईत. त्यात त्यांच्यात वाद असला तर जमीन संपादनाला वेळ लागतो. नुकसानभरपाई देणेही अवघड होते. त्यामुळेच स्थानिक आमदारांनी यात सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले.
गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास कमी करण्यासाठी या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २५ ऑगस्टपर्यंत हे खड्डे भरले जातील आणि त्यानंतर लगेचच तेथे प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. या पाहणीच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सोबत घेतले जाईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.