पुणे (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांत आता पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यातही पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कोकणात काही भागांत मुसळधार पाऊस झाला आहे.
सध्या राज्यात हलका पाऊस होत असला, तरी पुढील तीन दिवसांत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. ते वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर ते धडकणार आहे. या दोन्ही राज्यांसह महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, सिक्कीम, पूर्व-मध्य प्रदेशमध्ये याचा परिणाम होणार आहे. या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.