मुंबई (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना शौर्य पदक, तर चार जणांना अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या वायू गळतीच्या वेळी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सात जवानांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
कस्तुरबा रुग्णालयात ७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारच्या वेळी दहा मेट्रिक टन क्षमतेच्या एलपीजी गॅसच्या टाकीतून वायूगळती झाली होती. एलपीजी गॅसच्या टाकीजवळच्या रुग्णालयातील कक्षात कावीळ व अन्य आजारांचे रुग्ण होते. तसेच जवळच्या इमारतीत कोरोनाचे रुग्णही दाखल होते.
अचानक वायू गळती झाल्यामुळे रुग्णालयात घबराटीचे वातावरण पसरले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. यावेळी अग्निशमन दलाने वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच कमी वेळात ५८ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविले, तर कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून सुखरूप बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना नुकतेच राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.