मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारची घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेने ३५ लाख राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण करण्याचा संकल्प सोडला आहे. मात्र कंत्राटदाराकडून तब्बल तब्बल एक लाख ५० हजार सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. मुंबई महापालिकेने तात्काळ सदोष राष्ट्रध्वज कंत्राटदाराला परत केले. कंत्राटदाराने राष्ट्रध्वज बदलून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून देशभरात येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. देशवासियांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना मोफत राष्ट्रध्वज देण्याचा संकल्प सोडला आहे.
मुंबईतील ३५ लाख घरांमध्ये राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आपल्या संकल्पपूर्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने ३५ लाख राष्ट्रध्वजाची खरेदी केली. मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजांचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे. खरेदी केलेले राष्ट्रध्वज विभाग कार्यालयांकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ते सदोष असल्याचे निदर्शनास आले.