विलास खानोलकर
एके वर्षी पाऊस न पडल्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे सावट दाटले. लोकांनी अनेक प्रकारची अनुष्ठाने, पर्जन्यसूक्ते, शंकरावर अभिषेक चालू केले, तरीही पाऊस पडेना. एक दिवस श्री स्वामी काशीविश्वेश्वराचे जागृत स्थान असलेल्या ‘जेहूर’ गावी गेले. तेथे काशीविश्वेश्वरावर संततधार चालू होती. तेथून ते सेवेकऱ्यांसह ‘वळसंग’ गावी गेले. तेथेही अनुष्ठान सुरू होते.
लोक श्री स्वामी समर्थांस विचारू लागले, ‘महाराज, पाऊस केव्हा पडेल’ हे ऐकून महाराज शंकाराच्या देवळाच्या गाभाऱ्यात गेले. तेथे त्यांनी शंकराचे लिंग, गणपती आदी मूर्तींना विचारले, ‘पाऊस का पाडत नाही? तुम्हाला काय हरभरे पाहिजे काय?’ असे विचारून एकास हरभरे आणण्यास सांगितले. त्यांनी हरभरे मुठीत घेऊन देवांच्या मूर्तीवर ठेवले आणि धर्मशाळेत जाऊन बसले. सुमारे अर्ध्या तासानंतर जोराचा वारा सुटला. आकाशात ढग जमा झाले. मोठा गडगडाट होऊन जिकडे-तिकडे पाऊस पडू लागला. आसपासच्या गावातील मोठ्या जनसमुदायाने त्यांची षोडशोपचारे पूजा करून आरती केली. हात जोडून ते प्रार्थना करू लागले, ‘हे भगवान, हे सच्चिदानंद, हे विश्वपती, हे अनाथनाथ, हे करुणासागर हरभऱ्याचे निमित्त करून पुष्कळ वृष्टी करविली. धन्य! धन्य! सद्गुरूराज, सर्व दुष्काळ घालवून सुकाळ केला.’ पुढे त्या पावसाने पिकेही चांगली आली. तुम्हा आम्हाला चमत्कार वाटण्यासारखी आहे. रेडिओ, दूरदर्शन, संगणक आदी शोध सर्वसामान्यांना सुरुवातीस चमत्कारच वाटले. पण आता ते चमत्कार राहिले नाहीत. संशोधनाच्या अथक श्रमातून ते जसे साध्य झाले, तसेच योगधारणेने, योगसाधनेने तपश्चर्या, साधना आदीने ते शक्य झाले आहे. हे सर्वच प्रचंड कष्टसाध्य असल्यामुळे सर्वसामान्य माणूस अधिक खोलात न शिरता त्यास चमत्कार मानून हात जोडून मोकळे होतो. पण हे सर्व घडविताना श्री स्वामींनी त्याचे स्पष्टीकरण न देता जप, तप, पठण, अनुष्ठाने आदी करवून घेतली. अशा कृतीने आस्तिकपणा निर्माण होतो. श्रद्धा वाढते, सश्रद्धेने सकारात्मकता वाढते. आपल्या संस्कृतीतील ऋषी-मुनी, साधू-संत-महात्मे-सत्पुरुष आणि श्री स्वामी समर्थांसारख्या अवतारी विभूतींनी हेच महत्त्वाचे काम केले. समाजात आस्तिकपणा, श्रद्धा-सद्भाव-सकारात्मकता रुजविली, टिकविली आणि वाढविली. पण, यात अंधश्रद्ध व झापडबंदपणा नसावा. तसा श्री स्वामींचा अजिबात नसावा. त्यांनी लोकांकडून जप-पठण-अनुष्ठाने-पर्जन्यसूक्त – अभिषेक आदी करून घेतले. त्यांनी स्वतःही भगवान शंकराच्या देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन स्तोत्रे, मंत्रे, सूक्ते आदी म्हटली, पण त्यावेळच्या लोकांच्या अज्ञानामुळे त्यांना नीट समजले नाही. श्री स्वामींचा मोठा आवाज, देहबोली एकंदरी दैवी व्यक्तिमत्त्वामुळे देवच आहेत. श्री स्वामींनी देवादिकांचाच काय पण, सद्वर्तनी सत्पुरुषांचा कधी अवमान केलेला नाही. मनोबल वाढण्यासाठी, सकारात्मकता निर्माण करण्यासाठी हे असे करावे लागते, हे श्री स्वामींच्या या कृतीवरून प्रबोधित होते, की देव भक्तांच्या विनंतीने प्रसन्न होतो.