वर्षा फडके-आंधळे
भारताच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने, केंद्र शासनामार्फत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत अनेक विशेष कार्यक्रम, उपक्रम आयकॉनिक प्रकल्प आणि योजना यांचे नियोजन करण्यात आले आहे. आज भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. गेल्या ७५ वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळया क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरांत देशभक्तीची चेतना निर्माण करणारा ठरणार आहे. २० बाय १३ सेमी, १६ बाय २४ सेमी किंवा ६ बाय ९ सेमी या आकारातील तिरंगा या अभियानातून घराघरात फडकणार आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ५ आशय संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत. भारताचा स्वातंत्र्य संग्राम@७५, नावीन्यपूर्ण कल्पना@७५, नवे संकल्प@७५, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती@७५ आणि अंमलबजावणी@७५ त्शअ या पाच आशय संकल्पना आहेत. याशिवाय रस्ते संग्रहालय, मेरा गाव मेरी धरोहर, डिस्ट्रिक्ट डिजिटल रिपॉझिटरी, फिट इंडिया, बुजूर्गो की बात देश के साथ, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली, ‘घरोघरी तिरंगा’, स्वराज्य महोत्सव, विद्यार्थी विरासत उपक्रम इत्यादी संकल्पना देशभरात या वर्षभरात राबविल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रात ‘घरोघरी तिरंगा’ व स्वराज्य महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि ग्रामविकास विभाग काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सामील करून घेण्यासाठी शासकीय निधीतून ध्वज खरेदी करण्यात येणार आहे; परंतु या उपक्रमात प्रत्येक नागरिकांनी स्वत: राष्ट्रध्वज खरेदी करावा, यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात मिळून जवळपास २ कोटी ४५ लाख कुटुंबे आहेत, त्यापैकी कमीत-कमी २ कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाचे आहे.
राष्ट्रीयता व एकात्मता वृद्धीसाठी ‘घरोघरी तिरंगा’
देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या ‘‘घरोघरी तिरंगा’’ या अभियानाद्वारे देशभरात प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान यानिमित्ताने जपला जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे.
‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान देशातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियान यशस्वी होण्यासाठी राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करत आहे. ११ ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती, याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये १ तास प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. केंद्र शासनामार्फतही वेगवेगळ्या माध्यमातून राज्यांसाठी राष्ट्रध्वज उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्येही तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या http://harghartiranga.comया संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होता येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत ग्राम स्तरावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या लिस्टमध्ये महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. आतापर्यंत जवळपास १ हजारांहून अधिक कार्यक्रम अपलोड करण्यात आले असून जानेवारी २०२२ पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फतही १८ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील ३५ हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी संचालनालयाने महाअमृत www.mahaamrut.org या नावाने संकेतस्थळ सुरू केले आहे. ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासाठी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना समन्वयक अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी आणि जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. जिंगल, सेलिब्रेटीद्वारे आवाहन, विशेष गाणे, डिजिटल प्रचार प्रसिद्धी, सोशल मीडियावरील हॅशटॅग, जाहिराती इत्यादींचा वापर केला जाणार आहे. याशिवाय स्थानिक रेडिओ वाहिन्यांवरून आणि एमएफ चॅनेलवरून तसेच दूरदर्शन आणि खासगी चॅनेलवरून प्रसिद्धी, शासकीय संकेतस्थळे, लोकसहभाग याद्वारे प्रसिद्धी यावरही भर देण्यात येणार आहे.
स्वराज्य महोत्सव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. स्वराज्य महोत्सव राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्राम/वॉर्ड पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रामुख्याने हुतात्मा स्मारक सुशोभीकरण करणे, स्थानिक स्वराज्य संस्था विशेष सभा, जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, डिस्ट्रिक्ट डिजिटल रिपॉसिटरी, ७५ फूट उंचीचा ध्वज करणे, एनएसएस, एनसीसी, सायक्लो, मॅरा / वॉकेथॉन आयोजित करणे, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे, वारसा स्थळ पदयात्रा करणे, पुरातत्त्व स्थळांची स्वच्छता करणे, किल्ले येथील स्वच्छता प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्यापीठ स्तरावर कार्यक्रम आयोजित करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबरोबर स्वातंत्र्याचा अनसंग हिरो बुकलेट तयार करणे, कार्यालयांची स्वच्छता करणे आणि अमृत महोत्सवाचा लोगो शासकीय इमारतीवर लावणे आणि पुरातत्त्व वारसास्थळ दत्तक योजना राबविणे यासारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्राम स्तर आणि वॉर्ड स्तरावर विशेष सभांचे आयोजन करणे, शाळा/महाविद्यालये/अंगणवाड्या, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर आणि वॉर्ड स्तरावर ०९ ते १७ ऑगस्ट,२०२२ दरम्यान कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम आयोजित करावयाचे याच्या तपशीलवार सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.