Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

येत्या चार दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

पुणे : राज्यात काही भाग वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह, ठाणे, परिसरात आज पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप दिल्याने उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, रात्री पाऊसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर इकडे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या उघडीपीनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.


अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


आठवड्याभरापासून मुंबईत पावसाने दडी मारल्याने अतिशय उष्ण आणि दमट वातावरणात तयार झाले होते. मात्र, रात्री पावसाने हजेरी लावण्याचे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईत आणखी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच तिसऱ्या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


राज्यातील अनेक भागात आषाढी एकादशीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र, काही भागात पावसाने उघडीप दिल्याने शेती काम करण्यास मुभा मिळाली. यादरम्यान शेतकऱ्यांनी आपले खुरपणी, वखरणी, खते टाकणे अशी कामे उकरुन घेतली आहे. राज्यात आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून, येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment