माथेरान (वार्ताहर) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी, यासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झालेली आहे. आगामी काळात ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अश्वपालकांनी मूक मोर्चा काढला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे व अधीक्षक कार्यालयात जाऊन ई-रिक्षाच्या विरोधात त्यांनी निवेदन सादर केले आहे.
वाहनास प्रतिबंध असलेले आशिया खंडातील माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. ई-रिक्षामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अश्वपालकांचा व्यवसाय असुरक्षित होणार आहे. स्थानिक प्रशासनाने आम्हा अश्वपालकांना विश्वासात न घेता शासनाकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. आम्ही भूमिपुत्र म्हणून गावाच्या विकासासोबत राहिलो आहोत. ई-रिक्षामुळे ४६० घोड्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. ई-रिक्षाच्या चाचणीस विरोध असल्याचे अश्वपालकांनी निवेदनात नमूद केले आहे.