Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तान चितपट! स्मृती मानधनाची अर्धशतक खेळी

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तान चितपट! स्मृती मानधनाची अर्धशतक खेळी

इंग्लंड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० सामना रंगला. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा गडी राखून पराभव केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधाना धमाकेदार अर्धशतकीय खेळी करून भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. पावसामुळे हा सामना १८-१८ षटकांचा झाला. भारताचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला आहे.

पाकिस्तानच्या संघाने भारताला दिलेल्या १०० धावांचे आव्हान भारताने सहज पार केले आणि मोठा विजय मिळवला. भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक नाबाद ६३ धावांची खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. पाकिस्तानच्या संघाने १९ षटकात सर्वबाद ९९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने आक्रमक सुरूवात केल्याने फक्त ११.४ षटकात १०२ धावा करून आणि ८ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताकडून शेफाली वर्माने १६ तर एस मेघनाने १४ धावा केल्या.

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवण्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना अपयश आले. भारताकडून स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले आहेत. तर मेघना सिंग, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी पटकावण्यात यश आले आहे. तर आलिया रियाज आणि ओमामा सोहेल या दोघीही धावबाद झाल्या. पाकिस्तानकडून तुबा हसन वगळता कोणत्याच गोलंदाजाला बळी पटकावण्यात यश आले नाही.

भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाकिस्तानच्या संघाला पहिल्या ११.३ षटकांमध्ये ४ बाद केवळ ६४ धावा करता आल्या होत्या त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवून पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला.

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ १९ चेंडूत १७ धावांवर असताना स्नेह राणाने तिला बाद केले. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक ३२ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण स्नेह राणाने पाकिस्तानच्या आशेवर पाणी टाकले. इरम जावेद आणि डायना बेग या पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही.

Comments
Add Comment