वसई : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुरुची बिच, रानगाव बिच, ब्रम्हपाडा बिच, भुईगाव व चिंचोची धबधबा, देवकुंडी कामण व राजोवली खदान या पर्यटन स्थळावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १८ ऑगस्ट पर्यत मनाई आदेश लागू केला असल्याची माहिती परिमंडळचे पोलीस उप आयुक्त संजयकुमार पाटील यांनी कळविले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ २ वसई कार्यक्षेत्रात मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने धबधबे, नैसर्गिक पर्यंटन स्थळे व समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी पर्यटक पालघर, ठाणे, रायगड, मुंबई इत्यादी परिसरातून येत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी पर्यटकांची जिवीत व वित्त हानी होवू नये किंवा पर्यटकांचे जीवन धोक्यात येवू नये याकरीता प्रतिबंधात्मक म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याचे श्री पाटील यांनी नमूद केले आहे.
वरील पर्यंटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या धबधबे, तलाव, खदान किंवा बिच या ठिकाणांच्या सभोवताली १ किलोमीटर परिसरात दिनांक ३०/०७/२०२२ रोजीचे ००.०१ वाजेपासून ते दिनांक १८/०८/२०२२ रोजीचे २३.५९ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. या ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. पावसामुळे वेगाने वाहनाच्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे अथवा त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे. पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मध्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, वाहनांची ने-आण करताना बेदकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डीजे सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पीकर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे पोलीस उप आयुक्त, संजयकुमार पाटील यांनी कळविले आहे.