Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यनागपूर नागरिक सहकारी बँक

नागपूर नागरिक सहकारी बँक

शिबानी जोशी

१९६०-६५ च्या सुमारास बँकिंग क्षेत्र हे ग्रामीण भागापर्यंत अतिदुर्गम भागापर्यंत पोहोचलं नव्हतं. शहरी तसंच श्रीमंत वर्गातील लोकांनाच बँकिंग सेवा तसंच मोठमोठी कर्ज उपलब्ध होऊ शकत असत. विदर्भामध्ये काही सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज मिळायची. पण त्याचं प्रमाणही खूप कमी होत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे हेच वैशिष्ट्य म्हणता येईल की, समाजाला ज्या गोष्टीची निकड भासते, ते कार्य निस्वार्थ बुद्धीने सुरू करायचं. नागपूरमधील काही कार्यकर्त्यांनी कर्जाची ही गरज लक्षात घेऊन सहकारी बँक सुरू करण्याचं ठरवलं. खरं तर हे खूपच धाडसाचं तरीही भविष्यकाळत भरभराटीला येणारं उद्दिष्ट आहे, हे जाणवण्याइतकी दूरदृष्टी संघ कार्यकर्त्यांमध्ये होती. मध्यमवर्गीयांना कर्जाची सोय व्हावी, युवकांना रोजगार मिळावा तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनाही मदत करता यावी, अशा उद्देशाने मध्य भारतामध्ये सहकारी तत्त्वावर बँक सुरू करावी हे व्हिजनच खरं म्हणजे क्रांतिकारी म्हणावं लागेल. ते नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या रूपात १९६२ साली साकारलं. संघाचे त्यावेळचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेने प्रभाकर फैजपूरकर, बुलाखी दास बांठिया, प्रेमजी भाई शहा यांच्यासारख्यांनी लावलेल्या रोपाचा पुढे अनेक संघ कार्यकर्त्यांनी वटवृक्ष केला.

‘पैशावर विश्वास न ठेवता विश्वासावर पैसा ठेवा’ या उक्तीनुसार संत्रानगरी नागपूर येथे पहिली शाखा सुरू झाली. सुरुवातीला लोकांना बँकिंगचे महत्त्व पटवावं लागलं; परंतु विश्वास व पारदर्शकता लक्षात आल्यावर बँकेने जमा आणि कर्ज दोन्ही बाबतीत मागे वळून पाहिलं नाही. आज तीन राज्यांत ४५ शाखांच्या माध्यमातून बँकेचे काम सुरू आहे. २६०० कोटींच्या मिश्र व्यवसायापर्यंत पोहोचलेल्या बँकेला आजवर मिळालेल्या अनेक कर्तृत्ववान संचालकांच्या दूरदृष्टीमुळे बँकेने विदर्भात बँकिंग क्षेत्रात अनेक बाबतीत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक संजय भेंडे हे अनेक वर्षे बँकेशी निगडित असून बँकिंग क्षेत्रात नवीन येणारे तंत्रज्ञान नागपूर सहकारी बँकेत आणून बँकिंग अद्ययावत करत असतात.

नागपूर नागरिक सहकारी बँकेची स्थापना १९६२ मध्ये झाली. त्यानंतर देशात १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झालं आणि देशातल्या महत्त्वाच्या बँकांचा जिल्हा, तालुका, गाव स्तरावर झपाट्याने विस्तार होऊ लागला आणि बँकिंग सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागली. त्यानंतर अनेक खासगी बँका, बँकिंग क्षेत्रात उतरल्या आणि अगदी प्रथम स्थानावरही जाऊन पोहोचल्या. इतकी स्पर्धा निर्माण झाली असतानाही नागपूर नागरिक सहकारी बँकेने आपलं अस्तित्व, तर टिकवले आहेच शिवाय बँकेच्या शाखांचा विस्तारही झपाट्याने होत आहे, असं आपल्या लक्षात येईल. याला कारण काय असावं? तर प्रामाणिक, सचोटी, पारदर्शक व्यवहार, बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या तांत्रिक बदलांचा त्वरित स्वीकार करणे आणि भविष्य काळाबाबतची दूरदृष्टी असलेल संचालक मंडळ.

याचं उदाहरणच द्यायचं झालं, तर २०१५ साली एकाच दिवशी बँकेने महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये नवीन शाखा उघडल्या. त्याशिवाय बँकेने मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर महाराष्ट्रातल्या ५ बँकांचे यशस्वी विलीनीकरण केलं आहे. त्याशिवाय नागपूर सहकारी बँकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या शाखा जास्तीत-जास्त स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये सुरू करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असून ते सफल होण्याच्या मार्गावर आहे. नागपुरात पहिली एटीएम सेवा देण्याचे श्रेयही नागपूर सहकारी बँकेला जातं. अलीकडेच देशभरात फास्ट टॅग संकल्पना आली. ही फास्टर सुविधा उपलब्ध करून देणारी पहिलीच सहकारी बँकही ठरली आहे.

आपण सबल झालो की, दुर्बलांना मदत करणे ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार स्वतःच्या आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक भान ही बँकेने राखलं आहे. ‘राष्ट्राय स्वाहा, इदम न मम’ या भावनेने बँकेने अनेक रुग्णालयांना, सेवाभावी संस्थांना मदतीचा हात दिला आहे. सेवाभारतीचा फिरता दवाखाना, दळवी रुग्णालय, विवेकानंद मेडिकल मिशन अशा रुग्णालयांना रुग्णवाहिका दिल्या आहेत. हेडगेवार रक्तपेढीला रक्त संकलित करण्यासाठी अद्यायावत वाहन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाला वैद्यकीय उपकरण बँकेने दिली आहेत. समाजाबरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांकडेही बँक नेहमी लक्ष पुरवते. बँकेत सध्या साडेतीनशेहून अधिक कर्मचारी वर्ग आहे.कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात आला आहे तसेच दररोज सकाळी शाखा उघडताना प्रत्येक शाखेत मानवतेची प्रार्थना म्हटली जाते, तेथे आलेल्या सर्व ग्राहकांबरोबर सर्व कर्मचारी वर्ग दररोज सकाळी ही प्रार्थना म्हणतो. त्याशिवाय शाखेत ‘पान, खरडा, तंबाखू बंदी’ अमलात आणली आहे.

देशात परिवर्तन घडवणाऱ्या महान व्यक्तींचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून बँक दर वर्षी व्याख्यानमाला आयोजित करते. त्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यापासून यमाजी मालकर, युवा खासदार तेजस्वी सूर्या अशा अनेक दिग्गजांचे विचार ऐकवण्याचं काम केलं जात आहे. गरजूंना आर्थिक बळ व ठेवीदारांना सुरक्षा हमखास मिळत असल्यामुळे बँकेची घोडदौड सुरू आहे. बँकिंग व्यवहारामधे विश्वासाला खूप मोठे महत्त्व आहे आणि गेले साठ वर्षे ग्राहकांच्या मनात हाच विश्वास अबाधित राखल्यामुळेच बँकेचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. आज देशात अनेक सहकारी तसेच खासगी बँकांची सद्यस्थिती पाहिली, तर अशा प्रकारे दर वर्षी सातत्याने नफ्यात चालणारी आणि अतिशय नाममात्र एनपीए असलेली नागपूर सहकारी बँक म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -