रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग हा सध्या खडतर झाला असून पावसामुळे चौपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. त्यातच कोसळणाऱ्या दरडी यामुळे हा संपूर्ण मार्ग धोकादायक बनला असतानाच याला पर्याय म्हणून कोकण रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला खऱ्या अर्थाने उतरली आहे. दरडी कोसळून वाहतूक तासनतास ठप्प होत आहे. त्यापेक्षा रेल्वेचा प्रवास सुखकर अशीच प्रतिक्रिया प्रवाशांतून येत आहे.
रत्नागिरी तालुक्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग गेले अनेक वर्षे पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. त्यातच वेळोवेळी निघणारी कामे आणि त्यातच पावसामुळे घाटरस्त्यात सातत्याने कोसळणाऱ्या दरडी यामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढत आहे. त्यातच मुंबई -गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोकण रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली आहे. रेल्वेचे तिकीटही कमी असल्याने मुंबई ते रत्नागिरी जिल्ह्यात येण्या-जाण्याचा खर्च भागतो तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच गाड्याही वेळेवर सुटत असल्याने रेल्वेच बरी असे प्रवाशांकडून सांगितले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व रत्नागिरी स्थानकावर सर्व रेल्वे गाड्या प्रामुख्याने थांबतात. त्यातच अति जलदगाड्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर थांबत असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. भविष्यामध्ये राजापूर जंक्शनही होणार असुन अणुऊर्जा प्रकल्प ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे रेल्वेला गती येईल हे निश्चित.