Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेलय भारी! सकाळी आदित्य गटात; सायंकाळी शिंदे गटात

लय भारी! सकाळी आदित्य गटात; सायंकाळी शिंदे गटात

मुंबई/ठाणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर संपूर्ण राज्यात शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले हे भगदाड सावरण्यासाठी युवराज, आदित्य ठाकरेंनी मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मात्र, जेथे सकाळी आदित्य ठाकरे आगे बढो अशा घोषणा दिल्या तिथेच सायंकाळी या शिवसैनिकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात काल सकाळी भिवंडी आणि ठाण्यात पोहोचले. येथे आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे निष्ठा यात्रेप्रमाणेच शिवसंवाद यात्रेचाही फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटो ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची ‘निष्ठा यात्रा’ आणि ‘शिवसंवाद यात्रा’ म्हणजे केवळ मनोरंजन होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -