नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना प्रत्येक घरात तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांचे त्यांनी स्मरण केले.
आपल्या इतिहासातील काही संस्मरणीय गोष्टींचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आहे. ज्यामध्ये आपल्या तिरंग्याशी संबंधित समितीच्या तपशीलांची माहिती आहे. तसेच पंडित नेहरूंनी सर्वप्रथम तिरंगा फडकवल्याच्या घटनेचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे.
This year, when we are marking Azadi Ka Amrit Mahotsav, let us strengthen the Har Ghar Tiranga Movement. Hoist the Tricolour or display it in your homes between 13th and 15th August. This movement will deepen our connect with the national flag. https://t.co/w36PqW4YV3
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2022
यासंदर्भातील ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, यावर्षी आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा मोहिमेला पाठबळ देऊया. आगामी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा. या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील. आपल्या इतिहासात आजच्या २२ जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे, कारण १९४७ रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. त्यानिमित्ताने आज आपल्या इतिहासातील काही संस्मरणीय गोष्टी तुम्हाला सांगतो आहे, ज्यामध्ये आपल्या तिरंग्याशी संबंधित समितीच्या तपशीलांची माहिती आहे. तसेच पंडित नेहरूंनी सर्वप्रथम तिरंगा फडकवल्याच्या घटनेचाही उल्लेख आहे. ’वसाहतवादी राजवटीशी लढत असताना ज्यांनी स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांचे आज आपण स्मरण करूया. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.