चंद्रपूर (हिं.स.) : काही अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली असली तरी अद्यापही धोका कायमच आहे. परिणामी पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही रस्ते बंद आहेत, तर काही भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.
पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चारवट, हडस्ती येथील ईरई नदीचे पुलावर जवळपास ७ फूट पुराचे पाणी असल्याने दोन्ही गावांचा मार्ग बंद आहे. दरम्यान बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर- राजूरा- हैदराबाद मार्ग बंद झाला आहे.
दहेली येथे वर्धा नदीचे पाणी वाढल्याने येथील २० कुटुंबातील सदस्यांना शाळेत रात्री ठेवण्यात आले. चारवट येथील १८ कुटुंबातील सदस्यांना नवीन चारवट येथे स्थलांतरित करण्यात आले. हडस्ती, चारवट, जुनी चारवट येथे सभोवताल सोमवारी रात्रीपासून पुराचे पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.