सीमा दाते
एकीकडे शिवसेनेत पडलेली फूट आणि दुसरीकडे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक, यामुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला राज्यातील सरकार गमवावे लागले आहे. मात्र आता ठाण्यातील नगरसेवक, अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक आणि बदलापूरचे नगरसेवक, मीरा-भाईंदरचे नगरसेवक सध्या शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईच्या नगरसेवकांचे काय? ते पण होणार का शिंदे गटात सामील? असा प्रश्न आता उभा राहतोय.
राज्यात आमदारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यातील शिवसेनेचे ६६, तर अंबरनाथ नगर परिषदेचे २२ आणि बदलापूर-कुळगाव नगर परिषदेचे २५ नगरसेवक शिंदे गटात, तर मीरा-भाईंदर महापालिकेतील सामील झाले आहेत. यामुळे आता मुंबईतील शिवसेना नगरसेवकांच्या मनात नेमकं काय चालले आहे? हा प्रश्न आहेच, सध्या मुंबईतील शिवसेनेचे ५ आमदार शिंदे गटात सामील आहेत, दादर-माहीमचे सदा सरवणकर, चांदीवलीचे दिलीप लांडे, कुर्ला मंगेश कुडाळकर, बोरिवलीचे प्रकाश सुर्वे आणि भायखळाच्या यामिनी जाधव या सामील झाल्या आहेत, तर गेले अनेक ४ वर्षे मुंबई महापालिकेत स्थायी समिती पद भूषविलेले यशवंत जाधव यांच्या पत्नीही शिंदे गटात आहेत, तर यशवंत जाधव हे स्वतःही शिंदे गटात सहभागी आहेत. त्यामुळे यशवंत जाधव यांचा एक मोठा नगरसेवकांचा गटही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.
आमदारांनंतर सध्या कोणत्याही शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली नसली तरी शिवसेनेच्या दहिसरच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मात्र हिंमत केली आहे. त्यामुळे शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ शिवसेनेच्या नगरसेवकांची रांग लागण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, मीरा-भाईंदरचे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेतच. पण आता मुंबईसाठी कोण हिंमत करून पुढे येणार? हा प्रश्न होता. मात्र शीतल म्हात्रे यांनी हिंमत दाखवल्यानंतर आता कोण त्यांच्यामागून येणार? हा प्रश्न आहेच. म्हणजे एकीकडे मुंबईची सुरवात होणाऱ्या दहिसर आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मानला जाणारा गड भायखळा येथील नगरसेवक शिंदे यांच्यासोबत आहेत.
दरम्यान येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेतील इच्छुक तयारी करत आहेच. मात्र ऐन वेळेला तिकीट वाटपावरून नाराजी झाल्यास देखील नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. यासाठी आता शिवसेनेकडे सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे जे नगरसेवक, शिवसैनिक शिवसेनेत उरले आहेत. त्यांची मनं जपणं, एकही नगरसेवक फुटू न देणे आणि येणारी महापालिका निवडणूक जिंकणे. यासाठी आता निष्ठा यात्रा, संपर्क अभियान सुरू असले तरी शिवसेनेला कितपत नगरसेवक थांबवणं जमणार आहे, हे वेळच सांगू शकते. सध्या शिवसेनेचे नगरसेवक हे संभ्रमात असल्याची चर्चा सुरू आहे. आपलं हीत नक्की कोणत्या शिवसेनेत आहे, याबाबत नगरसेवक विचारात आहे. खरे तर शिवसेनेत सगळेच निष्ठावंत असतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली असली, तरी ती हिंदुत्वसाठी केली, बाळासाहेबांच्या विचारांसाठी केली, त्यांची अजूनही बाळासाहेबांशी, त्यांच्या शिवसेनेशी आणि आनंद दिघेंशी निष्ठा आहे आणि म्हणूनच ते अद्यापही स्वत:ला शिवसैनिक म्हणवतात. तसेच इतर शिवसैनिकांचेही आहेच. मात्र तरीही आता आपण कोणत्या गटात जायचं? असा गौण प्रश्न अनेकांना पडलाय.
ठाणे, अंबरनाथ, बदलापूरच्या नगरसेवकांनी हिंमत दाखवली. पण आता मुंबईतील नगरसेवकांचे काय? मुंबईतील नगरसेवकांच्या आतल्या गोटात बंडखोरीच्या चर्चा सुरू आहेत, हे नक्की. पण कदाचित त्याला वेळ जाईल. मात्र नगरसेवक या संभ्रमातून बाहेर येतील.
मुंबई महानगरपालिका अशी नगरपालिका आहे की, तिच्यावर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष तयार आहेत. मात्र आता लढत आहे ती भाजप आणि शिवसेनेचेची. सध्या राज्यात सरकारमध्ये भाजप असल्यामुळे तो कौल भाजपच्या बाजूनेच लागण्याची शक्यता आहे. मात्र गेले ३० वर्षांहून अधिक काळ सत्ता गाजवलेल्या मुंबई महापालिकेवरून सहजासहजी माघार कशी घेणार? म्हणूनच दुसरीकडे शिवसेना अतोनात प्रयत्न करत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता जास्त काळ नाही. काहीच महिने उरले आहेत. त्यामुळे यात आणखी काय काय बदल होणार, कोण कुठे जाणार, कोण स्वतःचे हित बघणार? हे पाहायचं आहेच. पण शिवसेनेचे नगरसेवक नेमकं काय पाऊल उचलणार? हेही महत्त्वाचे आहे.
सध्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत, अनेक ठिकाणी यंदा तरुण शिवसैनिक दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत युवासेनेचे नेतृत्व पुढे असल्याची शक्यता आहे. पण मग जे नगरसेवक पुन्हा येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचं काय? त्यांची नाराजी दूर होईल का? अशी अनेक आव्हाने सध्या पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेकडे आहे.