मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मुंबईकरांची पुढील दहा महिन्यांची पाणी चिंता मिटली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ८४.४१ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे. पाऊस असाच सुरू राहील तर अवघ्या काही दिवसांत सर्व तलाव १०० टक्के भरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला होता. या तलावांत ९ टक्क्यांपर्यंत जलसाठा उतरला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात देखील केली होती. मात्र जलसाठ्यात वाढ झाल्यानंतर पाणी कपात रद्द करण्यात आली.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. सातही धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली. सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातही धरणांमध्ये ८४.२१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणांमध्ये १२,२१,७८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास लवकरच १०० टक्के पाणी साठा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच मोडक सागर, तुळशी आणि तानसा हे तिन्ही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे मुंबईकरांची पुढील दहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जलसाठा इतक्या लवकर मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे.
मुंबईकरांना वर्षभराला १४,४६,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. आज मितीस तलावांमध्ये १२,२१,७८३ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा होण्यासाठी केवळ २,२५,५८० दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज आहे. जर असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिला तर लवकरच पाणीसाठा १०० टक्के होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.