धार : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे इंदौरहून अंमळनेरकडे ५० ते ५५ प्रवासी घेऊन येणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली. सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ही बस एसटी महामंडळाची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. ही दुर्घटना खाल घाटात बांधलेल्या नर्मदा पुलाची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस इंदौरहून महाराष्ट्राकडे जात होती. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. खरगोनचे जिल्हाधिकारी कुमार पुरषोत्तम आणि एसपी धरमवीर सिंहही घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे लोक होते, असे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारची बस होती, सकाळी सातच्या सुमारास इंदौरवरुन जळगावकडे जात होती. आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.