Sunday, March 23, 2025
Homeकोकणसिंधुदुर्गशिरोडा समुद्र किनारपट्टीची लाटांच्या तडाख्यामुळे धूप

शिरोडा समुद्र किनारपट्टीची लाटांच्या तडाख्यामुळे धूप

धूप प्रतिबंधक बंधारा तुटून गेल्याने समुद्राचे पाणी वस्तीत

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सध्या समुद्राचे रौद्ररूप शिरोडा समुद्र किनारपट्टी गिळंकृत करत आहे. किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा लाटांच्या तडाख्यामुळे तुटून गेला असून समुद्राचे खारे पाणी आता बागायती सह वस्तीतही घूसत असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाने वेळीच यावर उपाययोजना करावी, अन्यथा मोठा अनर्थ घडेल, अशी भीती शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा वेळागर संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे यांनी व्यक्त केली आहे.

दिवसेंदिवस शिरोडा वेळागर येथील समुद्र पुढे पुढे सरकत असून किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. अनेक सुरुची झाडे, माड तसेच विजेचे खांब गेल्या दोन वर्षांत समुद्राच्या तडाख्यामुळे वाहून गेले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी वेळागरवासीयांच्या मागणीनुसार तत्कालीन विधान परिषदेचे आमदार परशुराम उपरकर यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून व शासन दरबारी आवाज उठवून शिरोडा किनारपट्टीवर दीड किलोमीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर केला होता. त्यानंतर साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा धूप प्रतिबंधक बंधारा घालण्यात आला. मात्र या बंधाऱ्याच्या जाळ्या तुटून गेल्या असून काळे दगडही लाटांच्या माऱ्यामुळे विस्कटून समुद्रात जात आहेत. परिणामी बंधारा पूर्णतः निकामी होत आहे.

माड बागायतीसह किनाऱ्यालगतच्या कुटुंबीयांनाही धोका

भरतीच्या वेळी आणि उधाणाच्या वेळी समुद्राचे रौद्ररूप किनारपट्टी भेदत वस्तीत घूसत आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या बाजूने व तुटलेल्या ठिकाणाहून समुद्राचे खारे पाणी थेट आता बागायतीपर्यंत येऊ लागले आहे. त्यामुळे या नागरिकांच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या माड बागायतीचे नुकसान होत असताना यांच्या घरांनाही धोका निर्माण होत आहे.

सुरुची झाडे, विजेचे पोल पडूनही शासकीय यंत्रणा गप्प

गेल्या दोन वर्षांत या किनारपट्टीला लागून असलेल्या एमटीडीसीच्या जमिनीतील अनेक सुरुची झाडे किनारपट्टीवर कोसळून झाडे वाहून गेली आहेत. तसेच किनारपट्टीवर विजेच्या लाइनसाठी लावण्यात आलेल्या काही विजेचे पोल किनारपट्टीची धूप झाल्याने पडून नुकसान झाले. हे नुकसान दर वर्षी वाढत आहे. मात्र तरीही संबंधित शासकीय यंत्रणा गप्प आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -