मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारांवर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आता सोमवारी दिवसभरात १६७ रुग्णांची नोंद झाली असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २५८ रुग्ण बेडवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात ६ हजार ८८६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात २.४२ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. २३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २१ हजार २६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९९ हजार ३९८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार २३३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २४२२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२८ टक्के इतका आहे. मुंबईत गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रसार होत आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.
डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, तर २३ जूनला २४७९ आणि ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८ व २ जुलैला ८११ तर ३ जुलैला ७६१ आणि ४ जुलैला ४३१, तसेच ५ जुलैला ६५९,तर ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली आहे.
११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद
मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात बीए-५ चे २६ रुग्ण
राज्यात बीए-५ चे २६ रुग्ण आढळले आहेत, तर बीए-२.७५ चे देखील १३ रुग्ण आढळले आहेत. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय अहवालामध्ये हे सर्व रुग्ण आढळले आहेत. यातील २३ रुग्ण मुंबई, तर १३ रुग्ण पुणे येथील आहेत. याशिवाय प्रत्येकी १ रुग्ण बुलढाणा, ठाणे आणि लातूर येथे आढळला आहे. या रुग्णांना २९ जून ते ४ जुलै या काळात कोरोनाची बाधा झाली होती. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १५८ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ७० झाली आहे.