मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेले टॅब धूळ खात पडले असून तब्बल १९ हजार ४०१ टॅब कपाटात पडून आहेत. तर असे असताना एक महिना उलटून गेला आहे. शाळा सुरू होऊन तरीही विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आलेले नाही.
मुंबई महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देता यावे यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी टॅब देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. फेब्रुवारी २०२२ पासून कंत्राटदाराने विविध शाळांना टॅब देण्यास सुरुवात केली मात्र आतापर्यंत ९० टक्के टॅबचे विविध शाळांमध्ये वितरण झाल्याचे समोर आले आहे. तर यासाठी महापालिकेने ३८ कोटी रुपये खर्च केले असून पण हे टॅब अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान शिक्षकांनाही टॅबचे प्रशिक्षण नसल्यामुळे टॅबचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर पालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये वायफायची सुविधा नाही. तर दुसरीकडे ई-मेल आयडी पण टॅबमध्ये ॲड करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून पालिका शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले आहे.
आधीच कोरोनामुळे दोन वर्ष मुंबई महापालिकेच्या शाळा बंद असताना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब विद्यार्थ्यांना देण्यात आले नाहीत. यामुळे जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दराडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.