रत्नागिरी (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) येत्या २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती उद्भवली आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना दळणवळणात येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा पुढे घेतली जाणार आहे. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र ३१ जुलै रोजी परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आयुक्तांनी कळविल्याची माहिती येथील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.