वैश्विक जीवनाला परमेश्वराचे अस्तित्व आधारभूत आहे. आधार हा शब्द महत्त्वाचा आहे. खरे तर त्याला नाथ हा शब्द वापरलेला आहे.
“अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेविले” माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन”
एकाजनार्दनी एकपणी उभा, चैतन्याची भाव भक्तिनाथ. बाईसुद्धा नवऱ्याला नाथ म्हणते. जर पती नसेल तर स्त्री अनाथ असते. तसे देव हा आपला नाथ आहे. देवाशिवाय आपण अनाथ आहोत. देव आहे म्हणून आपण सनाथ आहोत ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. त्याचे अस्तित्व कुणाला जाणवत नाही. हवेचे अस्तित्व कुणाला जाणवते? गुरुत्वाकर्षण शक्तीचे अस्तित्व कुणाला जाणवते? पण जग जे चाललेले आहे, ते गुरूत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून चाललेले आहे ना तसे परमेश्वर आहे म्हणून सर्व चाललेले आहे. नाहीतर सगळे थंड ही गोष्ट कुणाच्या ध्यानांत येत नाही. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली तर तुम्हाला देवाचे स्मरण सतत राहिल. देवामुळे मी बोलतो आहे, देवामुळे मी ऐकतो, देवामुळे मी पाहतो आहे हे एकदा ध्यानात आले की, देवाचे स्मरण सतत होत राहील. देव एकदा समजला की देवाचे स्मरण करावे लागत नाही, ते होते. देवाबद्दल प्रेम, देवाबद्दल गोडी,
देवाबद्दल आवडी, देवाबद्दल प्रीती आपल्या ठिकाणी केव्हा निर्माण होते? देवाचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे हे उमजते तेव्हा! आपण देवावर प्रेम कधी करणार? तुम्हाला देवच माहीत नसेल तर तुम्ही देवावर प्रेम करणार का? देवाचे प्रेम केव्हा निर्माण होते जेव्हा त्याचे अस्तित्व जाणवते तेव्हा देवाचे केवळ अस्तित्व हे इतके महत्त्वाचे आहे हे जाणतो तेव्हा देवाबद्दल प्रेम निर्माण होते, कृतज्ञता निर्माण होते.
आता ही कृतज्ञता नसेल तर कृतघ्नता निर्माण होते. देव नाही असे म्हणणारे लोक कृतज्ञ आहेत का? देव नाही असे कुणी म्हणूच कसे शकतो? आपण त्याच्या आधाराने जीवन जगत आहोत. देवाचे अस्तित्व लोकांना जाणवत नाही म्हणून ते संभ्रमात पडतात व देवाला विसरतात. देवाचे ज्ञान झाले तर तो देवाला कधीही विसरू शकत नाही.
– सदगुरू वामनराव पै