
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे पुढील ४८ तासांत बुजवा, अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ पालिका आयुक्तांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका रेणू हंसराज आदी उपस्थित होते.
मिहीर कोटेचा म्हणाले की, मुंबई शहरात गेल्या २० वर्षांत रस्ते बनविण्यासाठी २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. परिणामी मुंबईतील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. वाहनांचा खोळंबा होतो. याही पावसाळ्यात मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्या त्या विभागातील रस्ते अभियंत्यासोबत खड्ड्यांची पाहणी केली असता खड्ड्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे निदर्शनास आले.
मुंबईकरांना दर्जेदार, खड्डेमुक्त रस्ते मिळाले पाहिजेत अशी आग्रही भूमिका यावेळी मांडली असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. दरम्यान महापालिका आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ४८ तासांत खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासित केले असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.