मुंबई : मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, शहरात सखल भागांत पाणी साचले आहे. एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आले आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांकडे न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाच्या स्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा काही प्रमाणात रस्ते वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. परंतु मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.