मुंबई : शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आवाहन केल्याने नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेला मिळणारे चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवा, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफिल राहू नका, पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. “माझी प्रकृती ठीक असल्याने आता मी शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहे,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विरोधकांशी दोन हात करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.