मीनाक्षी जगदाळे
विविध प्रकारच्या नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये जर आपल्याला सर्वार्थाने टिकाऊ, घनिष्ठ स्नेहसंबंध जोपासायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला वैचारिक परिपक्वता, मोठे मन, विशाल दृष्टिकोन, बौद्धिक प्रगल्भता याचा आपल्यामध्ये विकास करणे आवश्यक आहे. कोणतेही नाते टिकविण्यासाठी दोघांनी काही बाबी आवर्जून अमलात आणणे आवश्यक आहे. वादविवाद झाल्यास तिथेच त्याच वेळी विसरून जावे, ताबडतोब एकत्र होऊन नव्याने सुरुवात करावी. कोणताही विषय जास्त ताणू नये, इतिहासातील अप्रिय घटना, एकमेकांच्या चुका सातत्याने उगळत बसू नये. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने आपल्या नात्यात फूट पाडण्यासाठी काहीही सांगितले, तरी शहानिशा केल्याशिवाय, त्यावर समोरच्याशी चर्चा केल्याशिवाय आरोप-प्रत्यारोप करू नयेत. नात्यांमध्ये कटुता येऊ नये, मन दुखावले जाऊ नये म्हणून आपल्या बाजूने पूर्ण काळजी घ्यावी. एकमेकांची मजा, मस्करी, चेष्टा जरूर करावी. पण त्यातून समोरच्या व्यक्तीचा अपमान होईल, असे वागू-बोलू नये.
नात्यातील प्रेम वाढविण्यासाठी एकमेकांना सदैव आधार देणे, सोबत करणे, साथ देणे यासाठी पुढाकार घ्यावा. फुकटचा मान आणि अपमान अहंकार धरून बसू नये, मनात कुढत बसण्यापेक्षा मनमोकळे बोलावे. आपल्या भावनांची देवाण-घेवाण जेव्हा सोप्या, पारदर्शक पद्धतीने होईल तेव्हा कोणतेच किल्मिष मनात राहणार नाही. कोणत्याही नात्यात जास्त काळ अबोला राहणार नाही, याची काळजी घ्यावी. वैतागलेले, चिडलेले, संतापलेले, नैराश्याचे रडगाणे सतत लावून फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी नातं जोडू नये. एकमेकांच्या गुणांची स्तुती करावी, एकमेकांचे अवगुणदेखील गोडीत दाखवून द्यावेत आणि मोकळ्या मनाने ते स्वीकारून त्यात बदल करण्याचा प्रयत्न व्हावा. कोणत्याही नात्यात संवाद हे प्रभावी माध्यम आहे. पण शब्दांचा वापर अतिशय समजून उमजून करावा. खालच्या दर्जाचे, शिवीगाळ करणारे, संशय घेणारे शब्द एकमेकांसाठी वापरू नयेत. एकजण चिडला असेल, तर दुसऱ्याने शांत राहावे, प्रतिउत्तर देण्याची घाई करू नये.
एकमेकांना विश्वासात घ्या, कायम खरं बोला, आपण समोरच्याला फसवू शकतो. पण आपल्या अंतरमनाला फसवता येत नाही. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. आरोग्यदायी नातं परमेश्वरावरील निस्सीम भक्तीसारखं असावं. ज्या भगवंताला आपण पाहत नाही, त्याच बोलणं ऐकत नाही, त्याच्यासोबत राहत नाही, तरी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतो तसा विश्वास नात्यात निर्माण करावा. असा विश्वास नात्यात निर्माण होण्यासाठी वैचारिक स्थैर्य आवश्यक असते. कोणत्याही नात्यात समोरच्याला गृहीत धरू नका. दर वेळेस त्यालाच झुकायला भाग पाडू नका, नातं टिकविण्याची गरज त्यालाच आहे म्हणून त्याला सतत विवश, मजबूर, आगतिक करू नका. काळजी, प्रेम, समर्पण, त्याग दोन्ही बाजूने असेल, तर नात्याचं सोनं होणार हे निश्चित.
नात्यांमध्ये एकमेकांना वेठीला धरणे, नातं जाचक वाटेल, नात्यांचा काच वाटेल अशा पद्धतीने वागू नये. नात्यात एकमेकांना स्वातंत्र्य देणे, स्पेस देणेदेखील अभिप्रेत आहे. सतत एकमेकांच्या मागे लागणे, प्रत्येक गोष्टीवर समर्थन मागणे, समोरचा आपल्याला कंटाळेल इतका त्याला हैराण करणे, त्याच्या प्रत्येक वैयक्तिक कामात, आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त लुडबुड करणेही धोकादायक ठरते. प्रेमाच्या काळजीच्या नावाखाली सतत एखाद्यावर प्रश्नांचा भडिमार करणे, सतत त्याला अपडेट्स विचारणे पण नकोसे वाटते. नातं जपताना अधिकार जरूर गाजवावा. पण त्यामुळे समोरच्याला आपण कैदेत असल्यासारखं वाटतं असेल तर त्याच्यापासून थोडं लांब राहणं, मौन पाळणं निश्चितच उत्तम राहील. नातं टिकविण्यासाठी अनेकदा शांत राहणं, वाट पाहणं, समोरच्याच्या कलाने घेणे पण आवश्यक आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही, आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणजे समोरचा चुकीचा आहे असा अर्थ होत नाही. अर्थात आपले आयुष्य एक पुस्तक आहे. त्यामध्ये नात्यातील, ओळखीमधील कोणावर धडा लिहायचा, किती मोठा लिहायचा, कोणावर एक पान लिहायचे, कोणाला एक ओळ जागा द्यायची आणि कोणावर संपूर्ण पुस्तक लिहायचे, हे जो-तो ठरवत असतो.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीनुसार अनेक प्रकारची, अनेक स्वभावाची, अनेक गुण अवगुणांनी भरलेली माणसे आपल्याला भेटतील. प्रत्येकजण जेव्हा स्वतःपासून नात्याचे पालन-पोषण करायला सुरुवात करेल, तेव्हाच वाढत चाललेला हा नात्यातील ठिसूळपणा संपुष्टात येईल.
meenonline@gmail.com
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…