
खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आज सुद्धा सुरूच आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वैभववाडीत कोकण रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने कोकण रेल्वे काही काळ ठप्प झाली होती. सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात २४ तासात १५५ मिलिमीटरच्या सरासरीने एकूण १ हजार ३२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात २४०.३ मिलीमीटर एवढा नोंदला गेला. वेंगुर्ला तालुक्यात १९३.७, सावंतवाडी तालुक्यात १९०, दोडामार्ग तालुक्यात १८७, कणकवली तालुक्यात १४८.१, मालवण तालुक्यात १४५.८, कुडाळ तालुक्यात १३८.८ तर सर्वात कमी देंवगड तालुक्यात ८०.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्हा जलमय होऊन जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
सावंतवाडी तालुक्यात तळवडे, कणकवली तालुक्यात खारेपाटण येथील बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले होते. छोट्या पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होते पाणी ओसरल्यावर पुन्हा वाहतूक पूर्ववत होते अशा घटना वारंवार घडत आहेत. काही ठिकाणी झाड, गोठे पडून नुकसान झाले आहे. पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच सुरु राहणार असल्याने जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.