मुंबई : विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सभागृहात जोरदार फटकेबाजी केली. मी पुन्हा येईन, असे म्हणालो, तेव्हा अनेकांनी माझी थट्टा केली. पण आता मी पुन्हा आलोय आणि यांना सोबत घेऊन आलोय, असेही देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. तसेच ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असेही फडणवीस यांनी सांगितले.
“मगाशी काही लोक इकडच्या लोकांवर ईडी ईडी असं ओरडत होते. होय, हे खरंच आहे. ही मंडळी ईडीमुळेच आली आहे. पण ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत,” असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला.
राजकारणात दोन्ही बाजू असतात, एकेका नेत्यावर ३० खटले टाकले. एका खासदारावर केस अशी टाकली की माझी गाडी देवदर्शनाला भाड्याने नेली आणि पाच हजार रुपये दिले नाही. त्यांच्यावर ४२० ची केस लागली. गिरीश भाऊंवर मोक्का लागणार होता, बरं झालं असतं लागला असता तर, असे म्हणत त्यांनी मिश्किल वक्तव्य केले.
“हनुमान चालिसा म्हटले की घर तोडणार. मी तर म्हटले मी नशीबवान आहे. रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी घर तोडण्याचा स्कोप नाही, कारण मी सरकारी घरात राहतो. नागपूरचे घर पूर्ण नियमांत आहे. या दोन्ही बाजू आहेत. कोणी कोणाबद्दल वाईट लिहू नये. राजकीय लिहिल्यावर पोस्ट टाकल्यावर लोक जेलमध्येमध्ये आहे. दिल्लीमध्ये हुकुमशाही चाललीय असे सांगायचे. महिना महिना जेलमध्ये ठेवतो. हनुमान चालिसाचा कार्यक्रम मागे घेतला, तरी १२ दिवस महिला खासदाराला जेलमध्ये टाकले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.