माधवी घारपुरे
सत्कर्म आणि समाजकार्य या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू होऊ शकतील का? यातील फरक निश्चितपणे स्पष्ट करता येईल का? असा विचार सहज मनात आला आणि विचारांची घुसळण सुरू झाली. देवपूजेत वेळ घालवणे, हजारो जप करणे, कीर्तन-प्रवचनाला जाणे या गोष्टी सत्कर्मात सहज येतील. पण समाजकार्यात येणार नाहीत. कारण या गोष्टी आपण ‘स्वान्त सुखाय’ करतो, असं माझं वैयक्तिक मत. यातून समाजाला काय फायदा? पण कुचाळक्या करण्यापेक्षा अशा गोष्टीत मन रमविणे १०० टक्के उत्तम. त्यामुळे प्रत्येक सत्कर्म हे समाजकार्यात येईलच असे नाही. पण निरपेक्षपणे दुसऱ्यासाठी केलेले सत्कर्म हे मात्र निरपेक्ष समाजकार्यात येईल. काहीतरी फायदा होईल. मोठेपणा मिळेल म्हणून केलेले काम समाजकार्यात मोडेल, असे वाटत नाही.
रस्त्यातून जाताना वाटेतला मोठा दगड कडेला उचलून ठेवला काय किंवा वाटेतली केळीची साल कचऱ्यात टाकणं काय, या गोष्टीत पण याला मूल्य नाही, अमूल्य आहे. कडेवर बाळ आणि हातात पिशवी घेऊन तिला उतरायला मदत करणे हे पण समाजकार्यच! आईच्या चेहऱ्यावरची कृतज्ञतेची भावना हेच आपलं बक्षीस!
आश्चर्य म्हणण्यापेक्षा कौतुक वाटावं अशी दोन उदाहरणं तुमच्यासमोर ठेवते. या गोष्टी समाजासमोर पोहोचायलाच हव्यात म्हणून.
डोंबिवली-अंबरनाथ बाय रोड जाताना वाटेत खोणी लागते. तिथे असलेली अमेय पालक संघटनेची ‘घरकूल’ ही संस्था बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे. वय १५ ते ६० पर्यंतची मुलंच म्हणते, कारण त्यांची बुद्धी १० वर्षांपेक्षा अधिक नाही. अशी ३० ते ४० जण त्या घरकुलात आनंदाने राहतात. पालक निश्चिंतपणाने मुलांना ठेवतात. इतकी छान व्यवस्था आहे. आई-वडील सांभाळतील इतकी काळजी घेतात. संस्थेचे काम पूर्णपणे चॅरिटीवरच चालते.
एक दिवस संचालिका बाई कामासाठी ‘घरकुलात’ जाणार होत्या. जाताना ती संस्था बघायला म्हणून अगदी सहज त्या आपल्या कामवाल्या बाईला बरोबर घेऊन गेल्या. ती मुलं, त्यांचं वागणं, तिथली स्वच्छता, खर्च सगळा तिने पाहिला. लोकांच्या मदतीवरच ही संस्था चालते, हे कळलं. पुढच्या महिन्याला संचालिकाबाई कामवालीला पगार द्यायला लागल्या, तर ती म्हणाली,
“ताई या महिन्यापासून ५ महिने मला १०० रु. कमी द्या. तुमच्या घरकुलाला मला ५०० रुपये द्यायचे आहेत. मला एकदम ५०० रुपये कुठून जमणार?” याला उदार मनशिवाय दुसरं म्हणायचं तरी काय?
हा किस्सा मी ऐकला आणि मनात आलं, केवढा हा संस्कार! आपण भाकरी खाताना दुसऱ्याला चतकोर द्यायची भावना!
दुसरी हकीकत अशीच! कोरोनाच्या काळात संस्थेत २ वर्षे आत कुणाला घेतले नव्हते. मलाही गेटच्या बाहेर ठेवायच्या. तेथून मुले आत नेत. मी एकदा ड्रायव्हरबरोबर काही खाद्यपदार्थ, किराणा पाठवला. मी पण गेले नव्हते. ड्रायव्हर एकटाच जाऊन सर्व माल व्यवस्थित देऊन आला. तो आल्यावर गाडीची किल्ली त्याने मला आणून दिली. मी नेहमीप्रमाणे पैसे त्याच्या हाती दिले, तर म्हणाला, “ताई आज पैसे नकोत. तुमच्यासारखी माणसं तिथे किती मदत करतात. कुणी नावं पण सांगत नाही. मला गाडी चालवता येते म्हणून तेवढीच मदत करू शकतो” असं म्हणून चपला घालून जिना उतरलासुद्धा. हीच समाजाप्रती कृतज्ञता. म्हणूनच म्हणते, “समाजकार्य अहंकारापासून दूर असते. त्याला अहंकाराचा वास लागला की, ते नासून जातं. ना सत्कर्म ना समाजकार्य. मला काही मिळेल निदान थँक्स म्हणतील ही देखील अपेक्षा नाही. ती अपेक्षा ठेवली की कार्याला वाळवी लागली असे समजावे.”
अहंकारापासून दूर, अपेक्षेपासून लांब, प्रसंगी वेळ, पैसा, श्रम खर्च करायची तयारी असलेले, आनंदानं, स्वखुषीत केलं जातं ते सत्कर्म, सत्कार्य आणि समाजकार्य. तीच समाजसेवा. इतकी साधी, सहज,
सोपी व्याख्या!