हिरव्यागार कोकणात येवा

पाऊस लागला की, माळरान बघता बघता हिरवेगार होते. त्यात मुसळधार पावसामुळे गढूळ पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या वाकड्या-तिकड्या नद्या खास आकर्षण असते. कधी कधी पाऊस व ऊन एकाच वेळी पाहायला मिळते. अशा वेळी शेतकरी ‘कोल्ह्याचा लगीन लागला’ असे म्हणतात.


रवींद्र तांबे


महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाचा विचार केला, तर पावसाळ्यात कोकणात कुठेही जावा तुम्हाला निसर्गरम्य हिरवेगार कोकण दिसेल. अर्थात शुद्ध हवा आणि गारवा यामुळे कोकणात गेल्यावर ताजेतवाने झालेले वाटते. तेव्हा शहरातील बंदिस्त गार हवेत बसण्यापेक्षा चार दिवस कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात जाऊन या. आपल्याला वर्षभर राहिल्यासारखे वाटेल.


आज शहरात पाहिल्यावर रस्त्याच्या कडेला कुंडीत झाडे आणि एका फुटाचे हिरवेगार टवटवीत दिसणारे हिरवळीचे तयार केलेले गालिचे दिसतात. पाहिल्यानंतर आपल्यापण घरासमोर अशी हिरवळ असावी म्हणून ती खरेदी करतात आणि घराच्या समोर पसरून ठेवतात. अशा हिरवळीमुळे आपल्याला समाधान वाटत असले तरी त्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे चार-पाच दिवसाने हिरवळ कोमेजलेली दिसते. नंतर तिचा काहीच उपयोग नसतो. तिची अवस्था अळवावरच्या पाण्यासारखी होते. काही ठिकाणी तर बराच खर्च करून हिरवळ तयार केली जाते; परंतु ती पाहण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागते.


मात्र, कोकणातील हिरवळीचा नादच निराळा असतो. ही हिरवळ मुळातच निसर्गनिर्मित असल्यामुळे हिच्या सानिध्यात गेल्यावर तहान-भूक नाहीशी होते. शहरामध्ये रोज दूषित वातावरणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोकणात गेल्यावर प्रदूषणविरहित वातावरणामुळे ताण-तणाव दूर होऊ शकतो. इतकेच काय बऱ्याच वेळा शहरात राहणाऱ्या लोकांचे पायाचे दुखणे असेल, तर अशा हिरवळीवर चप्पल काढून फिरल्यावर आपोआप पाय दुखणे बंद होते. म्हणजे ज्यांचे पाय दुखत असतील, तर अशा लोकांना कोकणात येऊन कोकणच्या हिरवळीवरून चालावे लागेल तसेच इतरांनीसुद्धा निसर्गाचा आनंद लुटावा यात जो आनंद मिळतो, तो आनंद शहरातील बंदिस्त फ्लॅटमध्ये मिळणार नाही. याला म्हणतात नैसर्गिकरीत्या शुद्ध वातावरण. हेच काय, कोकणातील प्रसिद्ध जांभ्या दगडावरील हिरवळ पाहिली, तर काय ती दगडावरील हिरवळ म्हणायला विसरणार नाहीत. एवढे आकर्षण कोकणातील हिरवळीमध्ये आहे. ही निसर्गाने निसर्गनिर्मित कोकणाला दिलेली विनामूल्य देणगी आहे. तेव्हा हिरवळीवर पाय ठेवाल, तेव्हा काय ही कोकणची हिरवळ म्हणायला विसरणार नाही.


सध्या कोकणात भातशेतीची कामे सुरू झालेली असून भातशेतीची लागवड कशा प्रकारे करतात, याचे पण प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. आता जरी शेत नांगरताना बऱ्याच ठिकाणी बैलांची जोडी दिसणार नाही, तरी मात्र ट्रॅक्टरने जमीन नांगरताना दिसेल. त्यामुळे शेती कशी केली जाते, याचा अंदाज येऊ शकतो. कोपऱ्यातील चिखलामध्ये लावणी कशी लावली जाते, हेही पाहायला मिळेल. भातशेतीच्या हिरवळीमुळे चिखल पूर्णत: झाकला जातो. त्यामुळे हिरवेगार दिसणाऱ्या कोकणाचे भातशेतीच्या हिरवळीने अधिक सौंदर्य वाढलेले दिसते. विशेष म्हणजे शेतीच्या कडेला असणारी हिरवी झाडे जणू काय भातशेती पाहण्यासाठी पर्यटकांना साद घालत आहेत, असे वाटते.


कोकणात माळरानावरील जमीन असो अथवा लहान मोठ्या टेकड्या मन मोहित करते. त्यात पश्चिमेला अथांग अरबी समुद्र त्याच्या काठाला लागून नारळी-सुपारीची डोलणारी हिरवीगार झाडे पाहिल्यावर इथेच राहावेसे वाटते. कोकणातील हिरवळीला कोणत्याही प्रकारची लागवड करावी लागत नाही.


पाऊस लागला की, माळरान बघता बघता हिरवेगार होते. त्यात मुसळधार पावसामुळे गढूळ पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या वाकड्या-तिकड्या नद्या खास आकर्षण असते. कधी कधी पाऊस व ऊन एकाच वेळी पाहायला मिळते. अशा वेळी कोकणातील शेतकरी ‘कोल्ह्याचा लगीन लागला’ असे म्हणतात. त्याहीपेक्षा अशा निसर्गाच्या सानिध्यात असणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. असा आनंद काही कमी व्यक्तींना घेता येतो. त्यात अभूतपूर्व सप्तरंगी इंद्रधनुष्याचे दर्शनसुद्धा होते. त्यामुळे त्या परिसरातील हिरवळ अधिक फुलून दिसते.


कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा सन १९९९ मध्ये देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणची शान आहे. कोकणातील हिरवळ, झाडांची हिरवीगार पालवी, समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला व विविध किल्ले, डोंगरावरील हिरवीगार झाडी, आंब्या-फणसाची झाडे आणि त्याच्या जोडीला कोकणी मेवा त्यामुळे कायम पर्यटक आकर्षित होताना दिसत आहेत. कारण ही सर्व हिरवळ निसर्गनिर्मित आहे. कोणत्याही प्रकारे संगोपन करावे लागत नाही. राज्यातील पावसाचा विचार करता राज्यातील इतर विभागांचा विचार करता त्यांच्या तुलनेने कोकणात सरासरी जास्त पाऊस पडतो. आज कोकणात जिकडे तिकडे पाहिल्यावर हिरवीगार हिरवळ दिसत आहे. ही हिरवीगार हिरवळ म्हणजे कोकणचे सौंदर्य वाढवत आहे. तेव्हा हिरवेगार कोकणचे सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात गेलेच पाहिजे.

Comments
Add Comment

धास्ती चीनच्या नौदलाची

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव चीनच्या नौदलाची ताकद अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जहाज

ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर 

कोकणी बाणा : सतीश पाटणकर तगडा अभिनय, जबरदस्त संवादफेक, समोरच्याला आपल्या डोळ्यांनीच घायाळ करणारे व्यक्तिमत्त्व

मानव-सर्पातील वाढता संघर्ष

हवामानबदलामुळे विषारी सापांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होत असून मानव-साप संघर्षाचा धोका वाढू शकतो. एका

और क्या जुर्म है, पता ही नहीं !

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे चिंतनशील मनांना कधीकधी अगदी मूलभूत प्रश्न पडत असतात. ज्यांना नशिबाने कोणतेच

मैत्रीण नको आईच होऊया !

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मागील लेखात मैत्रीण नको आईच होऊया याबद्दल आपण काही ऊहापोह केला होता, मात्र

भुरिश्रवा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे माहाभारत युद्ध हे कौरव-पांडवांमध्ये लढले गेले. कौरव-पांडवांमधील प्रमुख