महाड : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड-भोर, पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, असा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून बऱ्याच घाटांत दरडी कोसळ्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
महाड-पुणे मार्गावरील वरंध घाट धोकादायक ठरत आहे. काल (गुरुवार) दरड कोसळल्यानंतर वरंध घाट आजपासून तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद ठेण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वरंध घाटात सातत्याने दरड रस्त्यावर खाली येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी घाट बंद ठेवण्याची अधिसूचना काढली आहे.
सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती आहे. तसेच रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन घाट वाहतुकीसाठी बंद ठेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढली आहे. दरम्यान, १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.