सोलापूर (हिं.स.) : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रखुमाईचे दर्शन मिळावे यासाठी आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत दर्शन २४ तास चालणार आहे. दररोज १ लाखांहून अधिक भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची उभारणी झाली आहे.
कोरोनापश्चात दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येतील अशी अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम पूर्ण केले आहे.
आषाढीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे यासाठी यात्रा काळात १५ दिवस देवाचे दर्शन २४ तास सुरू राहते. त्यामुळे देवाचा पलंग काढून ठेवला जातो. देवाच्या पाठीशी उशा ठेवून त्याला आधार दिला जातो. यंदा १ जुलै पासून १५ जुलैपर्यंत देवाचे दर्शन २४ तास चालू राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
दर्शन रांगेत पावसाची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी ४ आणि तात्पुरती ६ असे एकूण १० पत्राशेड उभे करण्यात आले आहेत. गोपाळपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दर्शन रांगेसाठी लाकडी बॅरिकेड्स उभा केले आहेत. त्यावर आच्छादन टाकण्यात आले आहे. दर्शन रांगेत पत्राशेड जवळ दोन ठिकाणी अन्नदान, जागोजागी जारमधील पाणीपुरवठा, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पुदलवाड यांनी सांगितले.