
जालंधर (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय हॉकी संघातील खेळाडू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी जालंधरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवून देण्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले होते. त्यामध्ये वरिंदर सिंग यांचाही समावेश होता.
हॉकी इंडियाने ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. सिंग यांच्या निधनाबद्दल हॉकी इंडियाने शोक व्यक्त केला आहे. “वरिंदर सिंग यांनी मिळवलेले यश जगभरातील हॉकी समुदाय स्मरणात ठेवेल,” असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.
वरिंदर यांना २००७ मध्ये ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वरिंदर सिंग हे १९७५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक होते. तेव्हा भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला होता.
याशिवाय, वरिंदर सिंग हे १९७२ म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघामध्ये त्यांचा समावेश होता. १९७३ मधील अॅमस्टरडॅम विश्वचषकात रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही ते भाग होते. १९७४ आणि १९७८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांना रौप्यपदक मिळवण्याची संधी मिळाली होती.