
पुणे (हिं.स.) : शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही. राज्य सरकार स्थिर आहे, की अस्थिर आहे याकडे आमचे लक्षही नाही. आम्ही आमची कामे करत आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावेळी “आसामचे मंत्री बंडखोर आमदारांच्या हॉटेलवर काय करतात?’ असे विचारले असता, “त्याची कल्पना नसून, ही माहिती तुमच्याकडूनच समजते,’ असेही पाटील यांनी सांगितले.
शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले असून, त्यात भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे. यावेळी बडोदा येथे केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचे बोलले जाते, असे पाटील यांना विचारले असता, ही माहिती मला तुमच्याकडूनच कळते असे सांगितले.
फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, “फडणवीस यांच्या दिल्ली भेटी नियमित आहेत. माध्यमांना आता त्या लक्षात येत आहेत. फडणवीस यांच्या कामाला वेग आहे. ते त्यांना हवी असलेली बैठकीची वेळ मिळाली की उद्या जाऊ, परवा जाऊ असे न करता रात्री-बेरात्री निघतात. त्यांच्या बैठका नेहमीच जास्त होतात.’