Monday, March 24, 2025
Homeमहत्वाची बातमीकोकणाला नव्या विकासपर्वाची चाहूल!

कोकणाला नव्या विकासपर्वाची चाहूल!

कोकण रेल्वे आता कोळशावर नाही, तर विजेवर धावणार आहे. खरं तर या बदलाचा रेल्वे प्रवाशांशी थेट संबंध नाहीये, पण येणाऱ्या काळात या विद्युतीकरण प्रकल्पाचा उपयोग केवळ प्रवासीच नव्हे, तर उद्योग-व्यवसाय यांनाही होणार आहे. याचाच अर्थ कोकणात उद्योगधंद्यानी यावे, यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून पायघड्या घातल्या आहेत.

अनघा निकम-मगदूम

कोणतीही चांगली गोष्ट होण्यासाठी योग जुळून यावे लागतात. असेच काही चांगले योग कोकणाच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत जुळून आले असून ते कोकणच्या नव्या विकासपर्वाची चाहूल देत आहेत.

क्षमता असूनही गेली अनेक वर्षे कोकण या प्रदेशाला सर्वांगीण विकासाची प्रतीक्षा होती. मुंबई या महानगराला जोडून असलेल्या प्रांतामध्ये झालेला विकास विखुरलेला झाल्याचे दिसून आला आहे. तळकोकण असूनसुद्धा सिंधुदुर्गने शिक्षणापासून व्यवसायापर्यंत, रोजगारपासून स्वयंरोजगारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. तिथले दरदोई उत्पन्नसुद्धा वाढले आहे. त्याच्या शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात मात्र विकासाचा शोध गेली अनेक वर्षे सुरूच आहे. रायगडमधील विकास हासुद्धा विषम आहे. अशा वेळी कोकणाला ठळकपणे जगाच्या नकाशावर उमटण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे. याची गेली अनेक वर्षे प्रतीक्षा इथल्या प्रत्येकाला आहे. तरच कोकणातील स्थलांतर हा प्रश्न निश्चित संपेल. असा योग आता जुळून येताना दिसत आहे. अशा काही सकारात्मक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून कोकणात घडत आहेत.

या संपणाऱ्या आठवड्यात कोकण रेल्वेच्या महत्त्वाकांशी विद्युतीकारण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याचाच अर्थ कोकण रेल्वे आता कोळशावर नाही, तर विजेवर धावणार आहे. खरं तर या बदलाचा रेल्वे प्रवाशांशी थेट संबंध नाहीये. पण येणाऱ्या काळात या विद्युतीकरण प्रकल्पाचा उपयोग केवळ प्रवासीच नव्हे, तर उद्योग-व्यवसाय यांनाही होणार आहे. याचाच अर्थ कोकणात उद्योगधंद्यानी यावे, यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून पायघड्या घातल्या आहेत. निसर्ग संवर्धन करणाऱ्या कोकणासाठी हा प्रकल्प निश्चित उपयोगीच नव्हे, तर इथल्या प्रत्येकाला आशेचा नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे.

एकीकडे कोकण रेल्वेने नवी झेप घेतली असताना गेली चार ते पाच वर्षे वादविवाद, विरोध याच्या गर्तेत अडकलेल्या राजापुरातील रिफायनरी प्रकल्पालासुद्धा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. नाणार येथून तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मात्र तरीही हा प्रकल्प कोकणात किती उपयोगी आहे आणि त्याची गरज किती आहे, हे इथलेच काही स्थानिक लोक पटवत राहिले. त्यातून बारसू येथेही हा प्रकल्प शक्य आहे, हे निश्चित झाले. गेल्याच आठवड्यात या भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याचे समर्थन केले. तसे स्पष्ट मत लोकांनी सरकारच्या प्रतिनिधींना कळवले. त्याच वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय पेट्रोलिअम मंत्र्यांची भेट घेऊन कोकणवासीयांची मागणी आणि गरज त्यांच्यासमोर मंडली. याला पेट्रोलिअम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रिफायनरी कोकणात शक्य असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. यातूनच प्रगतीचा नवा मार्ग दृष्टिक्षेपात येत आहे. हेदेखील एक सुचिन्ह असून कोकण विकासमार्गातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या दोन महत्त्वाच्या घटना म्हणजेच कोकण विकासासाठी जुळून आलेले दोन चांगले योग म्हटले पाहिजेत.

तर यासाठी जे प्रदेशाचा सर्वांगीण चौफेर विचार करणारे निर्भीड नेतृत्व लागते, ते नेतृत्व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रूपाने पुन्हा भक्कमपणे कोकण विकासासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारने सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालयाच्या रूपाने सन्माननीय नारायणराव राणे यांना हे मंत्रिपद दिले आहे. यातून देशातील अन्य प्रदेशासोबतच कोकणासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक लहान-मोठ्या उद्योगांना चालना मिळणार आहेच; परंतु हा प्रदेश विकासाच्या दिशेने जाण्यासाठी जो मार्ग निवडणे आवश्यक आहे, त्याचे नेतृत्व आता राणेसाहेबांच्या रूपाने आश्वासक हातात आले आहे. याच सगळ्या गोष्टी कोकण विकासाला चालना मिळण्यासाठी आणि इथे नवे पर्व सुरू होण्यासाठी आवश्यक असून तसे योग आता जुळून येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -