Sunday, June 22, 2025

सरकारमध्येच सुरू आहे फोडाफोडी...

सरकारमध्येच सुरू आहे फोडाफोडी...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आता आपापल्या उमेदवारांसाठी परस्परांच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधण्यास सुरूवात केल्याने आघाडीतच बिघाडी होणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी भारतीय जनता पार्टीने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले होते.


परंतु आघाडीतलेच उमेदवार आणि नेते लहानलहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांशी परस्पर संपर्क साधत असल्यामुळे तसेच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी शुक्रवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले. सह्याद्री अतिथीगृहात या आमदारांची एक बैठकही घेण्यात आली.


त्यानंतर त्यांची रवानगी थेट वेस्टइन हॉटेलमध्ये करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून त्यांच्या आमदारांना शनिवारी सकाळी मुंबईत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था नरीमन पॉईंटच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये करण्यात येणार आहे. भाजपानेही आपल्या आमदारांना कुलाब्याच्या हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये उतरविण्याचे ठरवले आहे.


काँग्रेसचे बहुसंख्य आमदार त्यांच्या परिसरात ईडीच्या राहुल गांधीविरूद्धच्या कारवाईच्या निषेधार्थ चाललेल्या आंदोलनात गुंतले आहेत. तरीही त्यांनी शनिवारपासून मुंबईत उपलब्ध राहवे, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. त्यांची सोय कुठे करायची हे अद्याप निश्चित झालेले नाही. महाराष्ट्र विधान परिषदेतून ६ ते २१ जुलै २०२२ या कालावधीदरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होणार आहे.

Comments
Add Comment