Monday, May 12, 2025

अध्यात्म

साईंची वटपौर्णिमा

साईंची वटपौर्णिमा

विलास खानोलकर


काही साईबाबा भक्त मानतात की, परभणी जिल्ह्यातील पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे. प्राचीन काळी पार्थग्राम तथा पार्थपूर नावाने ही भूमी ओळखली जात असे. गुलबर्गा येथील डॉ. भीमाशंकर देशपांडे यांच्या संशोधनानुसार, पाथरी गावात भुसारी उपनावाच्या ब्राह्मण कुटुंबात श्रीसाईमाऊलीचा जन्म झाला. मूळ नाव हरी. जन्मदिनांक २७ सप्टेंबर, १८३८ वेळ दुपारी १२ वाजून ५ मिनिटे २६ सेकंद. आईचे नाव देवगिरी अम्मा, वडिलांचे आडनाव भुसारी, नाव गंगा बाबुमिया. मोठे भाऊ अंबादास. श्रीसाईबाबांना एक बहीण होती. तिचे नाव बसवंतबाई. बहिणीचा निर्वाणकाल दिनांक होता १५ ऑक्टोबर, १९१८, बुधवार. बाबा नेहमी पाथरी येथील चौधरी घराण्याची चौकशी करीत, असा उल्लेख आढळतो. त्यानुसार ही माहिती खात्रीशीर वाटते.


पाथरी येथे १९९९ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भव्य मंदिरात श्रीसाईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पाथरीचा परिसर अत्यंत पुण्यप्रद आहे. जवळपास पुरातन देवालये आहेत. परभणी रेल्वेमार्गावर मानवत रोड स्टेशनजवळ आहे. बसस्थानकापासून एक किलोमीटरवर साईनगर ही बाबांची जन्मभूमी आहे. बालपणी ते एका फकिरासमवेत बारा वर्षे योगसाधना, तपश्चर्या करीत होते. त्यानंतर श्रीसाईबाबा हे हुमणाबाद येथील श्रीमाणिक प्रभू यांच्याकडे व अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थांच्या सहवासात काही काळ राहिले. गुरू आज्ञेनंतर शिर्डीमध्ये श्रीसाईबाबांचे १८५२ साली आगमन झाले. म्हाळसापती व काशीराम शिंपी हे बाबांचे प्रथम भक्त. त्यांनी बाबा माऊलीची राहण्याची सोय मशिदीत केली, ते स्थळ म्हणजे द्वारकामाई. नागपूरच्या गोपाळराव बुटी यांचा प्रचंड वाडा हे बाबांचे समाधी मंदिर आहे. काकड आरती, शेजारती इत्यादी दैनंदिन कार्यक्रम त्या वेळच्या भक्तांनी सुरू केले.


शिर्डीत आल्यावर बाबांनी योगशक्तीने धुनी सुरू केली. बाबा भक्तांना उदी देऊन लोककल्याण करायचे. लेंडीबागेत बाबांनी भरपूर फुलझाडे, वडाची झाडे लावली. हजारो बायका वटपैर्णिमा करायला बागेत येत. बाबा त्यांना आशीर्वाद, प्रसाद देत.



राहू दे गळ्यात मंगळसूत्र सदा
सुखी राहा दोघे सातजन्म
सदा ।।१।।
दान देतो मी ओले हळद कुंकू
देणार नाही तुझा संसार
सुकू ।।२।।
आनंदाने केलीस तू सप्तपदी
सुखी राहण्याचा मंत्र देते
उदी ।।३।।
तू सावित्री तो सत्यवान
आंब्या फणसाचे वाट तू
वान ।।४।।
वडाखाली मिळेल तुला प्राणवायू
नवऱ्याला मिळेल पुनर्जन्म दशायू ।।५।।
पेरू, नारळ, आंबा, फणस,वड
लाव तू झाडे जिंकशिल संसारगड ।।६।।
आनंदाने कर तू वटपौर्णिमा
१०० वर्षे प्रकाश देईल साई चंद्रपौर्णिमा ।।७।।
नको झाडे तोडू सदा
झाडे लावू
चला भक्तांनो साईची आरती गावू ।।८।।


[email protected]

Comments
Add Comment