Wednesday, May 7, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

मुंबईत कोरोना विस्फोट; दिवसभरात ९६१ नवे रुग्ण

मुंबईत कोरोना विस्फोट; दिवसभरात ९६१ नवे रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात मुंबईत ९६१नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ४४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून ३७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


दरम्यान, राज्यातही पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी राज्यात ६१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३८,५६४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४% एवढे झाले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये सध्या ४८८० सक्रिय रुग्ण आहेत.


मुंबईमध्ये आतापर्यंत १०,४५,४०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे ९८ टक्के आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी कालावधी १२०४ झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर ०.०५७% टक्के इतका आहे.


सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार ७६७ इतकी झाली आहे. राज्यात सध्या सहा हजार ७६७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ४८८० इतकी आहे. तर ठाणे ९६०, पालघर १००, रायगड १६७, पुणे ५०१ सक्रीय रुग्ण आढळले आहेत. नंदूरबार, धुळे, जालना आणि गोंदिया या ठिकाणी एकही सक्रिय रुग्ण नाही.


दरम्यान, देशातही कोरोना संसर्गात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४२७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण ५ लाख २४ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत २६१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मंत्रिमंडळाची आज बैठक, कोरोना निर्बंध लागू होणार?


शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अलर्ट झाले आहे. मुंबई पालिकेने टेस्टिंग वाढविण्यासह मालाडमधील कोव्हिड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले. तर राज्य सरकारची सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोना नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. राज्यात एकाएकी झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने एकूणच भितीचे वातावरण आहे. आतापर्यंत कोरोनामध्ये आपल्या सर्वांनाच मनाविरुद्ध या सर्व निर्बंधांचे पालन करावे लागले. मात्र पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाली आहे. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


...तर मास्कसक्ती अटळ


मुंबईत कोरोना रुग्ण संख्या अधिक वाढल्यास मास्कसक्ती अटळ असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना नियम न पाळल्यास कठोर निर्बंध लागतील, असा इशारा शेख यांनी दिला आहे.

Comments
Add Comment