Friday, August 15, 2025

मुंबईकरांनो, दोन दिवस पाणी जपून वापरा

मुंबईकरांनो, दोन दिवस पाणी जपून वापरा

मुंबई : मुंबईत ७ आणि ८ जून दरम्यान, मंगळवारी सकाळी १० ते बुधवारी सकाळी १० पर्यंत २४ तास पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. या निवेदनातून मुंबई महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाणी कपातीच्या आदल्या दिवशीच आवश्यक असलेला पाण्याचा साठा ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता शिवडी बस डेपोसमोर ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली ६०० मिलीमीटर आणि ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीची १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम मंगळवार ७ जूनला सकाळी १० पर्यंत तर बुधवार ८ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.

या कारणाने, सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गाव, काळेवाडी, नायगाव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण परिसर पाणीपुरवठा विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा