मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास तक्रारीवर पाठपुरावा करून बृहन्मुंबई महानगरपालिका, सर्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे, इत्यादी विविध संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत संवाद साधला जाणार आहे. तसेच माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. हे नियंत्रण कक्ष १ जून, २०२२ पासून ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत कार्यरत राहणार आहे.
प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची व पादचाऱ्यांची गैरसोय कमी व्हावी या उद्देशाने एमएमआरडीएने या नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. पावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षांकडून नागरिकांना मदत मिळू शकते. नियंत्रण कक्षातील अधिकारी/कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत. “सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी सुयोग्य बॅरिकेडींग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर वेळोवेळी जमा होणाऱ्या चिखलाची ताबडतोब विल्हेवाट लावणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे. ज्या परिसरात सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही आणि तसेच ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप उपलब्ध करुन देण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत”, असे प्राधिकरणाचे सहआयुक्त राहुल कर्डिले यांनी सांगितले. दरम्यान ,नियंत्रण कक्षाच्या ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) या दूरध्वनी क्रमांकांवर मदत मिळू शकेल, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.